डेक्कन कॉलेजच्या संशोधन विभागाने केलेल्या लातूर जिल्ह्यातील संशोधनात हे काही पाण्यात राहणारे आणि पाणी लागणाऱ्या प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत. पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आलेल्या संशोधनात विविध प्राण्याचे अवशेष हे या दुष्काळी भागात सापडलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पानघोडा, हत्ती आणि वाघ यांचे हे अवशेष आहेत. साधारणपणे हे प्राणी ज्या भागात वस्ती करतात, त्या भागात पाणीही मोठ्या प्रमाणात असतं. तसा जलमय परिसर असल्याने ते वास्तव्य करत असतात, असं संशोधनातून पुढे आले असल्याने मराठवाड्यात सुद्धा एकेकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होती, हे या संशोधनातून पुढे येत आहे.
डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाचे माजी प्राध्यापक डॉक्टर विजय साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील अति दुष्काळ असलेले जिल्हे लातूर, बीड या भागात त्यांनी २००४ पासून संशोधन करायला सुरुवात केली. २००४ ते २०२३ पर्यंत त्यांच्या संशोधनातून अनेक प्राण्यांचे वास्तव्य या भागात आढळून आले आहे. लातूर जिल्ह्यातील हरवाडी अंबाजोगाई परिसरामध्ये हे संशोधन करण्यात आले असून उत्खनन केल्यानंतर जे अवशेष सापडले आहेत, त्या आवश्यक मोठा पर्यावरणाचा इतिहास हा महाराष्ट्रासमोर आलेला आहे.
या सर्व संशोधनाचा अभ्यास केल्यानंतर यापुढे मराठवाड्यात हजारो वर्षांपूर्वी असलेले पाणी पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपयोग होणार आहे. शासनाने सुद्धा याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. कारण शासनाचा सर्वाधिक खर्च दुष्काळग्रस्त भागांमध्ये होत आहे. ते सुद्धा शासनाला कमी करता येणार आहे. या संशोधनातून पर्यावरणाचा इतिहास, मराठवाड्याचा इतिहास आणि मराठवाड्यात एकेकाळी वन्यप्राणी वनस्पती आणि जंगल त्याचे मुबलक प्रमाण होते हे यावरून सिद्ध होत आहे.