जरांगे पाटील म्हणाले, खानदेश भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे कपाशी पिकाची उंची घटल्याने शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. तुमच्याकडे मोठमोठाले नेते आहेत, ते आमच्याकडे येत होते. मग इथं त्यांचे हात मोडले आहेत का? त्यांना इकडे पाण्यासाठी तळे बनवता येत नाही का? अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता जरांगे पाटील यांनी निशाणा साधला.
जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा उल्लेख ‘येवल्याचं येडपट’ असा केला. त्यावरून पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील यांच्यात वाद पेटण्याची चिन्ह आहेत. जर तुम्ही एवढेच हुशार होता तर मग जेलमध्ये कसं काय गेले? असा पुन्हा एकदा सवालही केला.
जरांगे पाटील आज धुळे दौऱ्यावर आले असता सभेपूर्वी त्यांनी जुना आग्रा रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेले. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर जरांगे पाटील संबंधित कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. जरांगे पाटील यांनी देखील त्या कार्यकर्त्याला जोरात धक्का देत त्यावर संतापले. मला जसे धक्के देता तसे राज्यातील मंत्र्यांना असे धक्के देता येत नाहीत का? असा प्रश्न मराठा समाजातील कार्यकर्त्यांना भाषणादरम्यान विचारला.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने पहिला अहवाल स्वीकारला असून आता दुसरा अहवाल स्वीकारण्याच्या तयारीत आहे. आता २४ डिसेंबर पर्यंत आपली चांगलीच कसोटी आहे. तोपर्यंत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून एकजूट दाखवली पाहिजे, असं ते म्हणाले.