• Wed. Mar 11th, 2026

    मराठा,ओबीसी आरक्षणाच्या लढाईनंतर जालन्यात ब्राह्मण समाजाचं उपोषण, काय आहेत मागण्या?

    मराठा,ओबीसी आरक्षणाच्या लढाईनंतर जालन्यात ब्राह्मण समाजाचं उपोषण, काय आहेत मागण्या?

    छत्रपती संभाजीनगर: राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले असतानाच जालन्यातून आणखी एका आरक्षणाच्या लढाईचे रणशिंग फुंकले गेले आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक राननवरे यांनी ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, या मागणीसाठी जालन्यात आमरण उपोषण सुरु केले आहे. समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या पाठिंब्याने दीपक राननवरे यांनी मंगळवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने राननवरे यांनी हे आमरण उपोषण सुरु केले आहे.

    गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्यादृष्टीने शासकीय हालचाली सुरु झाल्या होत्या. याविरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आवाज उठवला होता. त्यासाठी आयोजित करण्यात आलेला पहिला ओबीसी मेळावा जालन्यातील अंबड येथे आयोजित करण्यात आला होता. याशिवाय, या परिसरात धनगर आरक्षणासाठीही साखळी उपोषणे सुरु आहेत. अशातच आता जालन्याच्या भूमीत ब्राह्मण समाजाला मोफत शिक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु झाल्याने राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    जालना तोडफोड प्रकरण, धनगर आरक्षण आंदोलक, पोलीस अन् जिल्हाधिकारी कोण काय म्हणाले?

    ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. सध्याच्या घडीला फार कमी सरकारी नोकऱ्या शिल्लक आहेत. त्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. या महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत मिळावी, अशी मागणी दीपक राननवरे यांनी केली.

    आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, ते काय आहे ते तर समजून घे, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

    आम्ही कोणत्याही नव्या मागण्या केलेल्या नाहीत. गेल्या १५ वर्षांपासून ब्राह्मण समाज याच मागण्या करत आहे. यामध्ये ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतीगृह उभारणे,देवळांमध्ये ब्राह्मण पुजाऱ्यांची नियुक्ती आणि सर्वसामान्य ब्राह्मण पुजाऱ्यांना ५ हजार रुपयांचे मानधन देण्यात यावे, अशा मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, ब्राह्मण समाजाच्या पुजाऱ्यांना उदरनिर्वाहासाठी इनाम म्हणून देण्यात आलेल्या वर्ग-२ च्या जमिनींना वर्ग-१ चा दर्जा दिला जावा. तसेच या जमिनींचे मालकी हक्क ब्राह्मण पुजाऱ्यांना दिले जावेत. तसेच मंदिरांमध्ये ब्राह्मण पुजाऱ्यांना परंपरेनुसार चालत आलेले व्यवस्थापकीय अधिकारही दिले जावेत, या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसल्याचे दीपक राननवरे यांनी सांगितले.

    अवैध वाळू धंदा ते लुटमारीचे गुन्हे अंगावर, जरांगेंच्या आंदोलनात पकडलेल्या ऋषिकेश बेद्रेने शांत आंदोलन बिघडवलं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed