• Sat. Sep 21st, 2024

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्हीपैकी एका जागेवर सोडावा लागणार पाणी; फॉर्मुला निश्चित?

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्हीपैकी एका जागेवर सोडावा लागणार पाणी;  फॉर्मुला निश्चित?

कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालती नंतर सर्व राजकीय समीकरणे बिघडली आहेत. यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीला देखील जागा वाटप ही डोकेदुखी ठरत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत महायुती मध्ये कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ हा सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार येत्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागांपैकी एक जागा भाजपला सोडावी लागणार आहे. अशा पद्धतीचे संकेत देखील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

एका जागेवर भाजपचा हक्क

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघापैकी एका जागेवर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडणूक लढवावा अशी इच्छा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बिद्री कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील लोकसभेच्या दोनपैकी एक जागेवर दावा केलाय. दोन्हीपैकी एका जागेवर भाजपचा हक्क असल्याच म्हणत कोल्हापूर आणि हातकणंगले यापैकी एक जागा भाजपला मिळावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे म्हणून पुढील निवडणुकीत ही आमचाच दावा

मात्र सध्या या दोन्ही जागांवर सध्या विद्यमान खासदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. राज्यात भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी महायुती चे सरकार आहे. यामुळे आगामी लोकसभेच्या जागा वाटप राज्यस्तरावर आणि पार्लमेंटरी बोर्डवर चर्चा करून वरिष्ठ निर्णय घेतील. मात्र आजच्या घडीला या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार असल्याने या दोन्ही जागांवर यापुढे देखील शिवसेनेचाच दावा असेल असे हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी म्हटल आहे.

अशी होती २०१९ चे युतीचे समीकरण

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती होती. आणि त्यावेळी जागा वाटपात कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा हे दोन्ही मतदारसंघ त्यावेळच्या शिवसेनेच्या वाट्याला आले. त्यानुसार कोल्हापुरातून खासदार संजय मंडलिक तर हातकणंगलेतून खासदार धैर्यशील माने विजयी झाले. गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर गेल्या काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेत राज्यातील ४८ पैकी २६ मतदारसंघ भाजपच्या वाट्याला तर उर्वरित २२ जागा या शिंदे व अजित पवार गटाला विभागून देण्याचा प्राथमिक फॉर्म्युला तयार झाला आहे. यामध्ये अंतिम चर्चेमध्ये तडजोड होऊ शकते. मात्र गेल्या २०१९ च्या निवडणुकीचा विचार केला तर भाजप आणि शिवसेनेची युती असताना राज्यात भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या त्यापैकी भाजप ने २३ जागा त्यांनी जिंकल्या होत्या तर शिवसेना २३ जागा वर निवडणूक लढवत १८ जागा जिंकल्या होत्या.

२०२४ ला बदलू शकत महायुतीचा समीकरण

२०२४ साठी भाजप ने एका वाढीव जागेची मागणी केली असून ही वाढीव जागा कोल्हापूर किंवा हातकणंगलेची असू शकते. सध्या या दोन्ही मतदार संघाचा आढावा घेतले असता महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोघांकडे देखील ताकतीचा उमेदवार नाही.शिवाय जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसल्याने जिल्ह्यात भाजपची ताकत वाढवायचे असेल तर या दोन्हीपैकी एका जागेवर भाजपच्या निवडणूक चिन्हावर उमेदवार निवडून यायला हवा अशी मागणी भाजप मधून केली जात आहे. शिवाय भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात केलेल्या सर्वेनुसार शिंदे गटाच्या दोन्ही विद्यमान खासदारांवर मतदारांची नाराजी असल्याचे उघड झाले आहे.सध्या दोन्ही जागांवर शिंदे गटाचा दावा ठाम असला तरी जिल्ह्यातील एका जागेच्या बदल्यात अन्य जिल्ह्यांतील एक जागा शिंदे गटाला देऊन त्याची भरपाई केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले संघापैकी कोणत्या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाला पाणी सोडावं लागणार हे पाहणं औत्सुक्याच बनलं आहे.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed