याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे-इंदूर महामार्गावर येवला, कोपरगाव, शिर्डीमार्गे पुण्याकडे, तर मालेगाव, धुळे, शिरपूरकडे जाण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकावरील ओव्हरब्रिज हाच एकमेव मार्ग आहे. १९५५ च्या दरम्यान या पुलाचे बांधकाम सुरू होऊन १९६२ मध्ये तो तयार झाल्याचे सांगितले जाते. बुधवारी या पुलाचा पूर्वेकडील भाग मोठ्या प्रमाणावर खचला व कठड्यासह खाली कोसळला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक रोखत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. एन. दराणे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तसेच मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी आणि अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. भुसावळ रेल्वेचे उपप्रबंधक शैलेंद्र कुमार यांनीही मनमाडला भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दराणे यांनी लगेच राडारोडा हटविण्याचे निर्देश दिले. एक महिन्याच्या आत पुलाची दुरुस्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी चौधरी यांनी मनमाड पोलिस स्टेशनला कुमक कमी पडू नये म्हणून नगर परिषदेचे कर्मचारी पोलिसांच्या मदतीला दिले.
दूधवाला ठरला देवदूत
पूल कोसळला त्यावेळी पुलावरून विरळ वाहतूक होती. यावेळी येथून दुचाकीवरून एक दूधविक्रेता जात होता. पूल कोसळल्याचे त्याच्या निदर्शनास येताच त्याने तत्काळ मनमाड पोलिस स्टेशन गाठले. पुलाचा भाग कोसळल्याची माहिती दिली. त्यानंतर दहा मिनिटांतच पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली. दूध विक्रेत्याने तत्काळ ही माहिती पोलिसांना कळवली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. या परिसरातील शाळा प्रशासनांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेज पाठवून याबाबत कल्पना दिली. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणारे विद्यार्थी शाळेत पोहचू शकले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक वळवली. त्याबाबतचे संदेश बस स्टँड आणि खासगी वाहनधारकांच्या संघटनांना दिली. पहाटेच्या वेळी पूल खचल्यामुळे येथून वाहतूक कमी होती. त्यामुळे जीवितहानी टळली. दिवसा या पुलावरून शिर्डीकडे जाणाऱ्या बस, विद्यार्थ्यांच्या व्हॅन तसेच अवजड वाहनांची रेलचेल असते. दिवसा पूल कोसळला असता तर मोठी हानी झाली असती.
अशी वळवली वाहतूक
धुळ्याहून शिर्डी-अहमदनगरकडे जाणारी वाहतूक मालेगाव -चांदवड, लासलगाव, येवलामार्गे
अहमदनगरकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक येवला-विंचूर-लासलगाव-चांदवड-मालेगावमार्गे
– संस्था, संघटनांच्या मागणीनंतर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले, पण कायमस्वरूपी दुरुस्ती झाली नाही.
– दहा-बारा वर्षांपूर्वी दोन ठिकाणी सांधे भरण्यात आले.
– गेल्या ऑगस्टमध्ये अभियंता संघटनेचे अध्यक्ष हेमंत लाळे व सहकारी अभियंत्यांनी पुलावरून अवजड वाहतूक थांबवण्याची मागणी केली होती.
– पुलाची अवस्था पाहता तत्काळ दुरुस्ती करावी, बायपास काढण्यात यावा, अशी मागणी केली होती. पण त्यावर कार्यवाही नाही.
– आमदार सुहास कांदेंनीही पूल धोकादायक झाल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
– तत्काळ दुरुस्ती करण्याचे रेल्वे मंत्री तसेच संबंधितांना पत्राद्वारे कळवले, मात्र त्यावर उपाययोजना झाली नाही.
Read Latest Maharashtra News And Marathi News