• Mon. Mar 16th, 2026

    मुसळधार पावसाने झोडपले; गारपिटीमुळे ९० मेंढ्या व शेकडो बगळे मृत्युमुखी

    मुसळधार पावसाने झोडपले; गारपिटीमुळे ९० मेंढ्या व शेकडो बगळे मृत्युमुखी

    वाशिम: आभाळाचे छत आणि जमीनीचे अंथरून करून ऊन, वारा, पाऊस सहन करत मेंढपाळ पोटच्या लेकराप्रमाणे आपल्या मेंढ्यांचा सांभाळ करतात. मात्र वाशिम जिल्ह्यात कालपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ९० मेंढ्यांचा मृत्यू झालाय.

    काल (सोमवार) रात्री एक वाजताच्या दरम्यान मोठा अवकाळी पाऊस झाला त्यातच गारपीटही झाली. अचानक आलेल्या ह्या पावसामुळे मंगरूपीर तालुक्यातील कोठारी परिसरात चाऱ्यासाठी आलेल्या पाचशे ते सहाशे मेंढ्या भिजल्या थंडीमुळे कुडकुडत यातील आठ ते दहा मेंढ्याचा सकाळपर्यंत मृत्यू झाला, तर तीस मेंढ्या बेपत्ता झाल्या. हीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य भागात पहायला मिळाली. कारंजा तालुक्यात ३५,मानोरा तालुक्यात १४ आणि मंगरूपीर तालुक्यात ४१ अशा तब्बल ९० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत आणि शेकडो आजारी झाल्या आहेत.

    मेंढपाळासाठी लाख मोलाच्या असलेल्या मेंढ्या एक एक करून मृत्युमुखी पडत असल्याने ते पुरते हवालदिल झालेत. सरकारने आता मदत करावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जातेय.

    कारंजा तालुक्यातील सोमठाणा येथील मेंढपाळ मागील आठ दिवसांपासून ५०० मेंढ्या घेऊन चारण्यासाठी कोठारी परिसरात मुक्कामी आहेत. काल शेखर जटाळे यांच्या शेतात मेंढपाळांचा मेंढ्यासह मुक्काम होता. रात्री अचानक आलेल्या वादळी पावसाने ४१ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर आठ ते दहा मेंढ्या आजारी पडल्या. यामुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

    पावसामुळे शेकडो बागळ्यांचाही मृत्यू

    रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला असून यामुळे तूर ,कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर मानोरा नगर पंचायतच्या चिस्ताळा परीसरात रात्री झाडावर बसलेले शेकडो बगळे मृत्युमुखी पडले आहेत. अवकाळी पावसाचा पिकांसह पक्षांनाही फटका बसला आहे.

    हवामान विभागाने इशारा दिल्या नुसार वाशिम जिल्ह्यात रात्री एक वाजता पासून दीड ते दोन तास विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुरीचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत असल्याने पावसामुळे फुलगळ होणार असून उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर इतर फळे आणि भाजीपाला पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस होण्याचा हवामान विभागाने दिला आहे.

    वाशिम जिल्ह्यात रात्री १ वाजल्या पासून सरासरी ५०.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ४६२ हेक्टर क्षेत्रावरील कपाशीच्या पिकाचे आणि ७०० ते ८०० हेक्टर इतर पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या प्राथमिक अहवालात व्यक्त केलाय. तर रिसोड तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed