• Sat. Sep 21st, 2024
नार्वेकर-फाटक सुरतमध्ये शिंदेंना का भेटले? सुनील प्रभूंना वकिलांचा सवाल, सुनावणीत खडाजंगी

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मंगळवारी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत सुनावणी पार पडली. या वेळी ठाकरे गटाचे प्रतोद प्रभू आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. या प्रकरणी आज, बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. सलग तीन दिवस या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

सुनावणीदरम्यान सुनील प्रभू यांचा जबाब नोंदवण्यात आला. सुरुवातीला प्रभू त्यांच्या वकिलांसोबत असताना जबाब देत असल्याने शिंदे गटाच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर विधानसभेच्या सभागृहात साक्ष नोंदवण्यासाठी ‘विटनेस बॉक्स’ आणण्यात आला आणि त्यात उभे राहून प्रभू यांनी साक्ष नोंदवली.

आरोपांबाबत प्रश्न

‘भाजप भ्रष्ट हेतूने चुकीच्या प्रभावाने काम करीत होता, हा आरोप आपण याचिकेत कशाच्या आधारे केला आहे,’ असा प्रश्न सुनील प्रभू यांना शिंदे गटाच्या वकिलांनी विचारला. त्यावर उत्तर देताना प्रभू म्हणाले, ‘आम्ही २०१९ मध्ये काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’सोबत सरकार स्थापन केले. त्यात एकनाथ शिंदे हेही मंत्री होते. मात्र, विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे दबावतंत्रात येऊन नियमबाह्य पद्धतीने वागले. भ्रष्ट मार्गाने भाजप वागला आणि म्हणून हे सगळे घडले. या अनुषंगाने मी हे म्हटले होते.’ त्यावर, ‘या संदर्भात तुम्ही जे केलेले वक्तव्य आहे ते फक्त मत आहे, की तसा तुमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे,’ असा उलट प्रश्न शिंदे यांच्या वकिलांनी केला. त्यावर प्रभू यांनी भूमिका मांडली.

अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, खंडणीखोर कृषी अधिकारी महिला लेकासह अटकेत, घरी १९ लाखांचं घबाड

‘खोटे बोलणार नाही’

‘आमच्या पक्षाचे अनेक आमदार पळून जात होते, त्यामुळे त्यांना कोणीतरी पळवून नेले असावे, त्यांच्यामागे कोणीतरी असावे असे बोलले जात होते. त्याची माध्यमात चर्चा होती, म्हणून मला जे वाटले ते मी त्यात नमूद केले आहे,’ असे उत्तर प्रभू यांनी दिले. ‘देशाचा नागरिक म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी खोटे बोलणार नाही. मला देशाच्या घटनात्मक यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे,’ असेही प्रभू म्हणाले. त्यावर, शिंदे गटाच्या वकिलांनी, ‘तुमची उत्तरे पाहता तुमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही असे दिसते,’ असा आरोप केला. त्यावर, ‘माझ्या बाबतीत असे म्हणणे गैर आहे. मी राज्यघटनेचा अपमान केलेला नाही. मी लोकशाहीचा आणि घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो,’ असे प्रभू म्हणाले.

विठुरायाच्या शासकीय पूजेला विरोध करण्याची संस्कृती नाही, अडथळे आणू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

ठाकरे गटाचा आरोप

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी गंभीर आरोप केला. ‘सुनील प्रभू जे सांगत आहेत ते व्यवस्थित नोंदवले जात नाही. प्रभू यांनी जबाब नोंदवताना बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊनही ते नमूद केले गेले नाही,’ असा आरोप वकील कामत यांनी केला. देवदत्त कामत यांनी असा प्रश्न उपस्थित करताच अध्यक्षांनी कामत यांनाच तुम्ही प्रभूंवर प्रभाव पाडत असल्याचे म्हटले. यावरही कामात यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘प्रभू जे बोलत आहेत त्याचे व्यवस्थित भाषांतर केले जात नाही. तुम्हाला शक्य होत नसेल, तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला भाषांतर करण्यास सांगा,’ असे देवदत्त कामत विधानसभा अध्यक्षांना म्हणाले. कामत यांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय खोलात, कन्या-सुनेवर आरोपपत्र, काय आहे कारण?

नार्वेकर, फाटक हे शिंदे यांना का भेटले?

एकनाथ शिंदे जेव्हा आमदारांसह सुरतला गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक त्यांना भेटायला गेले होते हे खरे आहे का? एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यापासून संपर्कात नव्हते, असे याचिकेत म्हटले आहे. परंतु, मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून तिकडे जाऊन भेटले. हे खरे आहे का, असा प्रश्न शिंदे गटाच्या वकिलांनी केला. त्यावर प्रभू यांनी एकनाथ शिंदे संपर्कात नव्हते हे खरे आहे. मात्र, मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी कशासाठी भेट घेतली ते मला माहीत नाही, असे उत्तर दिले. यानंतर मंगळवारची सुनावणी संपली.

मुख्यमंत्री सहकुटुंब कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी नतमस्तक; एका महिन्यातील दुसरा कोल्हापूर दौरा

Read Latest Mumbai Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed