• Sat. Sep 21st, 2024
रेल्वे क्रॉसिंग रोखण्यासाठी रेल्वेची कडक उपाययोजना, हार्बर प्रवाशांना आता रेलिंग रोखणार

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही अनेक प्रवासी वेळ वाचवण्याच्या नादात रूळ ओलांडत असल्याने, अपघात तसेत प्रसंगी प्रवाशांना मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने फलाटांच्या दोन्ही बाजूंचे रॅम्प तोडून त्या जागी लोखंडी रेलिंग बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात हार्बर मार्गावरील रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक असलेल्या रेल्वे स्थानकांत लोखंडी रेलिंगचे काम हाती घेतले जाणार आहे.

रेल्वे प्रशासनाने ‘मिशन जीवनरक्षा’ अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याअंतर्गत रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील तीन वर्षांत रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या ५० हजारांहून अधिक प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. याचबरोबर, उपनगरी मार्गांवरील विविध स्थानकांत जनजागृती कार्यक्रम तसेच यमराज अभियानही राबवण्यात आले आहे. दंडात्मक कारवाई, रूळ ओलांडण्यास मज्जाव, उद्घोषणांद्वारे जनजागृती अशा उपाययोजना केल्या, तरीही रेल्वे रूळ ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य व हार्बर रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांत फलाटाच्या दोन्ही बाजूंचे उतार, म्हणजेच रॅम्प तोडून त्याजागी लोखंडी रेलिंग बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची रेल्वे रूळ ओलांडण्याची सवय मोडेल आणि ते पादचारी पुलाचा वापर करतील, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.

NCP Crisis: अजित पवारांच्या गटातील ‘त्या’ माणसाला शरद पवारांनी थेट निवडणूक आयोगासमोर उभं केलं अन्…
रेल्वेचे आवाहन

प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाने मध्य व हार्बर रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानकांत पादचारी पूल, सरकते जिने (एस्कलेटर), लिफ्ट उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी बहुतेक स्थानकांत काम पूर्ण झाले आहे, काही स्थानकांतील कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रूळ न ओलांडता पूल, सरकते जिने, लिफ्ट यांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य व हार्बर रेल्वेमार्गांवरील सर्व स्थानकांतील रॅम्प तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरात लवकर सर्व रॅम्प तोडून त्याजागी लोखंडी रेलिंग बसवण्यात येतील. वर्षअखेरपर्यंत बहुतांश स्थानकांतील रॅम्प तोडून, त्या जागी रेलिंग बसवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी पादचारी पूल, सरकते जिने यांचा वापर करावा. आपले प्राण धोक्यात घालू नयेत.

– प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Mumbai Pollution: धुरक्यात हरवली मुंबई! वाढलेल्या प्रदूषणावर अचानक ‘मार्गदर्शक तत्त्वांचा’ मारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed