• Sat. Sep 21st, 2024
शेतकऱ्यांची मोट बांधणार, रथयात्रेचा एल्गार होणार, रविकांत तुपकर यांचा राज्यव्यापी दौरा

बुलढाणा: सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, तसेच येलो मोझॅक, बोंडअळीमुळे आणि पावसात खंड पडल्याने सोयाबीन कापूस तसेच इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिकविमा व शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलनाचा शंख फुंकण्यात आला आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांची मोट बांधण्यासाठी रविकांत तुपकरांच्या रथयात्रेला ५ नोव्हेंबर, रविवारपासून सुरूवात होत आहे.
स्वेच्छेने १६२ तास काम; चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, अन् दीपक ठरला ब्रिटीश सरकारचा ‘गोल्ड’ मॅन
शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन या यात्रेला सकाळी १०.०० वा. सुरुवात होणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच राज्यव्यापी दौरा, रथयात्रा आणि २० नोव्हेंबर रोजी एल्गार महामोर्चाची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी राज्याचा दौराही पूर्ण केला. परंतु मराठा आरक्षणाचे आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर त्यांनी आपली रथयात्रा तुर्तास स्थगित केली होती. आता मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण व मराठा आरक्षणाचे आंदोलन स्थगित झाल्याने रविकांत तुपकरांनी आपली नियोजित रथयात्रेसह आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. १ नोव्हेंबरपासून सुरु होणारी ही रथयात्रा आता ५ नोव्हेंबर सकाळी १०.०० वाजेपासून सुरु होत आहे. संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन पहिल्या दिवशी खामगाव तालुक्यात ही यात्रा असणार आहे.

५ नोव्हेंबर रोजी शेगाव नंतर सकाळी ११.०० वा. जलंब नंतर पहुरजीरा, माक्ता, माक्तावाडी, घाटपुरी, जळका भडंग, पिंपळगाव राजा, निपाणा, भालेगाव, ढोरपगाव तर काळेगाव येथे सभा व यात्रेचा मुक्काम होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता नांद्रा नंतर मांडणी, रोहणा, वर्णा फाटा, कंझारा फाटा, गोंधणापूर फाटा, मांडवा फाटा, शिरसगाव देशमुख, खामगाव शहर, टेंभुर्णा,आवार, अटाळी, गौंढाळा व लाखनवाडा येथे सभा व मुक्काम असणार आहे. त्यानंतर पुढे मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, बुलढाणा, मोताळा मार्गे पुन्हा बुलढाणा येथे पोहचणार आहे. गोवोगावी बैठका, सभा घेऊन शेतकरी आणि तरुणांची फौज एकत्र करण्याचे काम रविकांत तुपकर या यात्रेदरम्यान करणार आहे. २० नोव्हेंबर रोजी यात्रेचा समारोप बुलढाण्यात भव्य एल्गार महामोर्चात होणार आहे.

बच्चू कडूंचा जरांगे पाटलांच्या भावासोबत प्रवास अन् मनमोकळ्या गप्पा

सदर एल्गार रथयात्रा १ नोव्हेंबरपासून सुरु होणार होती. परंतु आता ती चार दिवस उशीराने म्हणजे ५ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. सुरुवातीच्या चार दिवसांमधील यात्रेची जी गावे आहेत त्या गावांमध्ये देखील यात्रेदरम्यान पोहचणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. यासाठी रात्रीचा दिवस करुन संबधित गावातील शेतकरी, कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्याचेही तुपकरांनी सांगितले आहे. ही रथयात्रा म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचा रणसंग्राम आहे. ५ नोव्हेंबरपासून संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात होणार आहे. सर्व शेतकरी व तरुणांनी आपल्या न्यायहक्काच्या लढ्यासाठी जात-धर्म आणि संघटना, पक्ष बाजुला ठेऊन शेतकरी-शेतमजूर म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed