• Thu. Mar 19th, 2026

    Maharashtra Drought: राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांचाही समावेश

    Maharashtra Drought: राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांचाही समावेश

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर आणि शिरूर या पाच तालुक्यांमध्ये राज्य सरकारने गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे आता जमीन महसूलात सूट, पीक कर्जाची संधी, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, आवश्यक तेथे टँकरचा वापर यांसारख्या सवलती पाच तालुक्यांमध्ये सरकारकडून लागू केल्या जाणार आहेत.

    राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा परिणाम झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी पुरंदर आणि बारामती तालुक्यांत गंभीर आणि शिरूर, इंदापूर व दौंड तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. पुरंदर आणि बारामती तालुक्यांतील सुमारे १३ हजार २३७ हेक्टर क्षेत्रात पेरण्या होऊनही २६ हजार ६४४ शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. शिरूर, दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील एकूण २३ हजार ७७८ हेक्टरमध्ये पेरण्या झाल्या असून, त्यात ४४ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

    पाच तालुक्यांतील पावसाची स्थिती
    तालुका एकूण पडलेला पाऊस (मिमि) पाऊस टक्केवारी…..

    पुरंदर २९९ ५२
    बारामती २६५ ५९
    दौंड ३०१ ७३
    इंदापूर ३४५ ७२
    शिरूर ४३१ ७२
    पुरंदर, इंदापूरमध्येही टँकर

    मार्च महिन्यापासून पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर, दौंड, खेड, जुन्नर, आंबेगाव या सहा तालुक्यांमध्ये टँकर सुरू झाले होते. मात्र, सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामध्ये टँकर सुरू असलेल्या तालुक्यांपैकी जुन्नर, खेड आणि आंबेगाव या तालुक्यांमधील टँकर संपुष्टात आले. पाऊस कमी झाल्याने पुरंदर आणि इंदापूर तालुक्यांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ आली.
    हंगामाआधीच पुण्यात द्राक्षे दाखल; नेहमीच्या तुलनेत दुप्पट दराने विक्री, किलोला किती भाव?
    शेतकऱ्यांना कोणत्या सवलती ?

    राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात पाच तालुके पुणे जिल्ह्यातील असून, त्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती सरकारने लागू करण्यास मान्यता दिली आहे. त्या पुढीलप्रमाणे –

    – जमीन महसुलात सूट देणे
    – पीक कर्जाचे पुनर्गठन
    – शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
    – कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट
    – शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट
    – रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
    – आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर
    – टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे

    पुणे जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसताच राज्य सरकारला त्याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर सरकारने राज्यातील दुष्काळी तालुके जाहीर केले आहेत. आता या तालुक्यांमध्ये विविध योजनांतर्गत सवलती लागू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed