आत्महत्या करण्यापूर्वी भोगे यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, ”मी जरांगे पाटील यांचे उपोषणास गेलो होतो. तिथे मला अभिमान वाटला. आपण मराठा समाजासाठी काहीतरी योगदान केले पाहिजे म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व आरक्षण मिळावे, आमचे मराठा बांधव सुखी व्हावेत म्हणून आरक्षण मिळण्यासाठी स्वदेह आत्मसमर्पण करून आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आहे”.
शनि शिंगणापूर पोलिसांनी पंचनामा करून ही चिठ्ठी जप्त केली. पोलिसांनी खरवंडी येथील मृत दत्तात्रेय अभिमन्यू भोगे यांच्या घरी भेट दिली. कुटुंबियांकडे विचारपूस केली. त्यातून त्यांना भोगे यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीची माहिती मिळाली.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील रहिवाशी सागर भाऊसाहेब वाळे या (वय २५) तरुणानेही याच कारणासाठी आत्महत्या केल्याची घटना यापूर्वीच समोर आली आहे. घराच्या मागील बाजूस पत्राच्या शेडमध्ये जाऊन गळफास घेतला. “आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे कोणाला जबाबदार धरू नये, एक मराठा लाख मराठा, आपला लाडका सागर मराठा” अशी चिठ्ठी लिहून त्याने जीवन संपविले.
एका बाजूला जरांगे यांच्यासह विविध नेत्यांकडूनही संयम राखण्याचे आवाहन केले जात आहे. हिंसक आंदोलन करू नका, असे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे हिंसक आंदोलने सुरूच आहेत आणि युवकांच्या आत्महत्याही सुरूच आहेत. गावोगावा साखळी उपोषणही सुरू आहेत. काही ठिकाणी त्याचे रुपांतर बेमुदत उपोषणात करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींचे राजीनामा सत्र सुरू असून त्यांच्या मालमत्तेवर हल्ले होत असल्याने पोलिस बंदोबस्त देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजमन पूर्णत: ढवळून निघाल्याचे सष्ट होते.