मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज (१ नोव्हेंबर) सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी, आमदारांनी उपस्थिती लावली. राज्य सरकार कायद्याच्या पातळीवर टिकेल, अशाच गोष्टी करेल. राजकारण कोणालाही करायचं नाही. आपण सगळे याबाबत सहकार्य करतच आहात. पण यापुढे आपल्यातील काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजूही समजून घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केलं. त्याचवेळी आंदोलकांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजू समजून घ्यावी, अशी विनंती देखील फडणवीस यांनी केली.
मराठे तापट आहेत, त्यांचा संयम आता संपलाय
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही सरकारला चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आता दम निघत नाही. मराठे तापट आहेत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येतंय, तोवर चर्चेसाठी या. मी मराठा समाजाशी बोलून तुम्हाला वेळ द्यायचा की नाही, हे ठरवतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्हाला आरक्षण कसं देणार हे आधी सांगा?
नुसती कागदं देऊन आमच्या मराठा समाजाला फसविण्याचं काम करू नका. आम्हाला आरक्षण कसं देणार हे आधी सांगा. मागच्या वेळी पण मराठा आरक्षण देण्यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमत झालं होतं, पण घोडं कुठं अडतंय, हे आम्हाला कळत नाही. किंबहुना बैठका होतायेत पण त्याच्यावर कार्यवाही होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.