शेगाव खोडके येथील शेतकरी नारायण खोडके यांनी पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच अवेळी पाऊस आणि त्यातच कर्जाचा डोंगर. पेरलेल्या पिकांना देखील अनेक रोगाचा फटका नापिकीला कंटाळून आत्महत्या करत आपली जीवन संपवलं. मात्र, आत्महत्या केल्याने त्यांच्या परिवारावर अजूनच दुःख वाढलं. इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी किरण खोडके हीने मुख्यमंत्री शिंदे यांनाच पत्र पाठवलंय.
तीनं आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं आहे की, “तुमचा दसरा चांगला गेला असेल आणि दिवाळी देखील चांगली जाईल. पण आमच्या घरी दसरा ही नाही अन् दिवाळीही नाही. आई सतत रडत असते. सोयाबीनला भाव असता, तर तुझा बाबा वारला नसता, असं आई सांगतेय. घरातून गेलेला बाबा पुन्हा आलाच नाही. आजीला विचारलं तर ती म्हणते बाबा देवा घरी गेलाय. सर देवाचं घर कुठे आहे त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला लवकर लवकर पाठवा. लवकरच दिवाळी आहे आणि मी आणि माझा दादू वडिलांची रोज वाट पाहतोय पण ते येत नाहीत. आता आम्हाला रिसोडच्या बाजारात कोण कपडे घेऊन देणार”, असा सवाल देखील या पत्रामधून या चिमुकलीनं केलाय.
”लोक सांगतात सरकारमुळे तुझा बाबा देवा घरी गेलाय हे खरं आहे का? देवाला सांगून माझ्या बाबाला परत आमच्याकडे पाठवा. बाबाला म्हणा तुमची दीदी खूप रडतेय. मग ते लवकर येतात”, असं वेदनादायी पत्र या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. सध्या हे पत्र सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत असून पत्रातील मजकूर वाचून अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात. नारायण खोडके यांनी जीवन संपवलं. मात्र, त्यांची ८० वर्षांच्या आईला हे दुःख सहन करण्याची ताकद देखील तिच्यात उरलेली नाही. तर आत्महत्या केल्यानं त्यांची पत्नी दुःख आणि वेदनेने रात्रंदिवस दुःखाच्या झळा सोसततेय.