मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आईने जेवण दिले नाही म्हणून किरकोळ वाद झाला. तसेच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी रागाच्या भरात जयेशने लाकडी दांडक्याने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोयत्याने मारत त्याने आपल्या आईला घराबाहेर अंगणात आणले. आईला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावरती पालापाचोळा टाकून तिला जिवंत जाळले. दरम्यान, ही दुर्दैवी घटना कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी चांगुणा खोत यांना अलिबाग उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अघोरी व निर्दयी खून करणाऱ्या जयेश नामदेव खोत (वय २५) असे या संशयित तरुण आरोपीचे नाव आहे. हे कृत्य केल्यानंतर जयेश जंगलात पळून गेला होता. रायगड जिल्हा पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. मात्र, काळोख पडल्याने शोध मोहीम राबवणे कठीण जात होते. पण तरीही रायगड जिल्हा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा जंगलात झाडे-झुडुप नदी-नाल्यांमधून शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी तो एका झुडपात लपलेला दिसला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याने पोलिसांनाही कोयत्याचा धाक दाखवला. अखेर दोन ते तीन तासांच्या पोलीस व ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांच्या शर्थीनंतर पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान आरोपी मुलाला अटक करण्यात यश आले
जन्मदात्या आईलाच अत्यंत क्रूरपणे मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या मुलाचा अत्यंत संतापजनक प्रकारचा निषेध करण्यात येत आहे. या आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांकडून करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग अरूण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल अतिग्रे प्रभारी अधिकारी रेवदंडा हे करीत आहेत.सदर आरोपी विरूध्द रेवदंडा पोलीस ठाणे येथे कॉ.गु. रजि. नं. 192/2023, भा.द.वि 302, 307, 323, 324,506 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस अलिबाग यांच्या मा. न्यायालयासमोर हजर करून त्यास आरोपीस एक दिवसाची पोलीस कस्टडी मंजुर करण्यात आली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News