जालन्यात लाठीचार्ज झाल्यानंतर आम्ही तातडीनं तिकडे गेलो. तिथं गेल्यानंतर एका माऊलीनं राखी बांधू का विचारलं, त्यानंतर तिनं सांगितलं की लाठीचार्ज झाला, पोलिसांनी मारलं, मी कशी बशी निसटले पण माझ्या मुलावर आणि सुनेवर लाठीचार्ज झाल्याचं त्या माऊलीनं सांगितल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न आमच्या सरकारच्या काळात देखील होता. पण, आमच्या काळात लाठीचार्जचे आदेश दिले गेले नाहीत, असं म्हटलं.
जालन्यात गेल्यावर मनोज जरांगे यांनी गोळी दाखवली, गोळीबाराचे आदेश देणारा डायर कोण आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला. मराठा आरक्षणाचा विषय इथं सुटणारा नाही, तो लोकसभेत सोडवावा लागेल. संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतील, असं वाटलं होतं. दिल्ली संदर्भातील निर्णय जसा फिरवला तसा मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवायला हवा होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसरीकडे मेळावा घेत आहेत, माझ्यावर टीका करा मी तुम्हाला किंमत देत नाही,असं उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करताना म्हणाले. मनोज जरांगेंना धन्यवाद देताना उद्धव ठाकरेंनी भाजप जे जातीपातीचं राजकारण करतंय ते हाणून पाडायचं असल्याचं म्हटलं.
मी पुन्हा पुन्हा सांगतो की भाजप, जनसंघ यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, मराठवाडा मुक्ती संग्रामात ते नव्हते. पण हात मारण्यासाठी ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभागी न होता ते संयुक्त महाराष्ट्र समितीत आले आणि सर्वात प्रथम बाहेर पडले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जनसंघ जनता पक्षात घुसला, पुढे शिवसेनेसोबत, अकाली लदासाोबत, कधी नितीश कुमार यांच्यासोबत गेले. भाजप जिथं जाते त्यांचा नाश करते त्यामुळं मनोज जरांगे यांनी सावध राहावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
