भाषा शिक्षण आणि साक्षरतेबाबत दृष्टिकोन, अध्यापनशास्त्र, अध्ययन, मूल्यांकन, वेळेचे व्यस्थापन अशा मुद्द्यांनाही महत्त्व देण्यात आले आहे. एनसीईआरटीने शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर, राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर कधी होईल, याकडे शिक्षक, अभ्यासक आणि तज्ज्ञांचे लक्ष लागले होते. त्यानुसार एससीईआरटीने सध्या पायाभूत स्तरावरील अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यात ० ते ८ वर्षांच्या बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन तत्त्वे सांगण्यात आली आहे. साधारण इयत्ता दुसरीपर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लागू राहणार आहे. येत्या काही दिवसांत बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती एससीईआरटीकडून देण्यात आली आहे.
या मसुद्यात प्राथमिक स्तरावर जोडणारे दुवे, सहाय्यीभूत शैक्षणिक परिसंस्था निर्मिती, अतिरिक्त निर्णायक क्षेत्रे अशा विषयांबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या मसुद्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तत्त्वे नमूद करण्यात आली असून, अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या मसुद्यात २०२५ पर्यत ३ ते ८ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला सुरक्षित, मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. त्यासोबतच प्रारंभिक बाल्यावस्थेतील संगोपनालाही महत्त्व देण्यात आले आहे. इयत्ता पहिली आणि दुसरीतील बालकांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्य, संगोपन, पोषण आणि सुरक्षिकता याकडे गंभीरतेने लक्ष देण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
या मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासक आदींनी आपले अभिप्राय किंवा हरकती २७ नोव्हेंबपर्यंत लिंकवर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवायचे आहेत. अभिप्राय पोस्टाने सुद्धा एससीईआरटीच्या पत्त्यावर पाठवता येणार असल्याचे उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. शैक्षणिक घटकांनी अधिक माहितीसाठी एससीईआरटीच्या https://maa.ac.in/ या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News