• Sat. Sep 21st, 2024
Maratha Reservation: आरक्षण घोषणा १० दिवसांत करा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

आंतरवाली सराटी (जि. जालना) : ‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. आता फक्त दहा दिवस उरले आहेत. येत्या २२ ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. त्यामुळे सरकारने २४ ऑक्टोबर रोजी आरक्षण जाहीर करावे. आरक्षणासाठी समिती नेमणे आणि पुराव्यांचा घाट घालण्याची गरज नव्हती. पाच हजार पुरावे आरक्षणासाठी पुरेसे आहेत. आमची सहनशीलता संपली असून, केंद्र व राज्य सरकारने आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा’, असा स्पष्ट इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी जाहीर सभेत दिला.

आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शनिवारी दुपारी ‘गरजवंत मराठ्यांचा लढा’ या मंचावरून मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. या सभेसाठी राज्यभरातून लाखो मराठा समाजबांधव उपस्थित होते. ‘आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक इंचही मागे फिरणार नाही. राज्य सरकारने आरक्षण दिले नाही, तर एवढे टोकाचे उपोषण करीन की एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही. पुढील दहा दिवस मराठ्यांनी गाफील राहू नये. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होईल’, असे जरांगे म्हणाले.

सरकारने मराठा समाजाच्या विनाकारण हालअपेष्टा करू नये. ओबीसीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. व्यवसायानुसार जाती निर्माण झाल्या, असे कायदा सांगतो. विदर्भातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे. मराठा समाजाचा व्यवसाय शेती आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा. मराठा समाजाचे आग्यामोहोळ शांत बसले आहे. पण, हे मोहळ एकदा उठले तर आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असे जरांगे म्हणाले.

भुजबळ, सदावर्तेंवर टीकास्त्र

आंतरवालीच्या सभेसाठी सात कोटी रुपये कुठून आले, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला होता. या आरोपाचे खंडन करीत जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘गोदापट्ट्यातील १२३ गावांच्या निधीतून ही सभा झाली आहे. लोकांनी दिलेल्या हजार-पाचशे रुपयांतून जमा झालेले २१ लाख रुपये सभेसाठी लागले. कुणी दहा रुपयेही देत नाही, असे भुजबळ म्हणतात. तुम्हाला देत नसतील पण आम्हाला देतात. भुजबळ यांना शेती घेण्याचे वेड लागले आहे. त्यांना वाटले १७० एकरांवर सभा घेतली म्हणजे वावरच विकत घेतले. स्वत: दोन वर्षे आत बेसन खाऊन आलेल्यांनी आम्हाला सांगू नये. अजित पवार यांनी भुजबळ यांना समज द्यावी.’ गुणरत्न सदावर्ते आणि भुजबळ मराठ्यांना उचकवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
Manoj Jarange Patil: ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार? मनोज जरांगेंनी सांगितला फॉर्म्युला
जरांगे यांच्या मागण्या

– मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा.
– कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी देण्यात यावी.
– आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांच्या कुटुंबीयांना निधी आणि सरकारी नोकरी देण्यात यावी.
– दर दहा वर्षांनी ओबीसी बांधवांचे सर्वेक्षण करून प्रगत जाती बाहेर काढाव्यात.
– ‘सारथी’ संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed