• Sat. Sep 21st, 2024
दीड तासाचा प्रवास २० मिनिटात शक्य, पण ठाणे-बोरिवली बोगदा सात वर्ष रखडला, कारण संताप आणणारं

मुंबई : घोडबंदर रस्त्यावरील भीषण वाहतूक कोंडीपासून मुक्तता देणाऱ्या ठाणे-बोरिवली व बोरिवली-ठाणे या बोगद्याची रखडपट्टी सात वर्षे कायम आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सन २०१५ मध्ये घोषित केलेला हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या भागातून जाणारा असल्याने वनमंजुरी अत्यावश्यक आहे. मात्र त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाच महिन्यांनंतर केंद्र सरकारकडे पाठवला. त्यामुळे दीड तासांचा प्रवास २० मिनिटांवर आणणारा हा १५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राज्य व केंद्र सरकारमधील मंजुरी प्रक्रियेत अडकल्याची स्थिती आहे.

ठाणे ते बोरिवलीदरम्यान संपूर्ण घोडबंदर रस्त्याला वळसा घालून दीड ते दोन तासांचा प्रवास टाळण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची टेकडी खणून तेथून बोगदा तयार करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. बृहत प्रकल्प आराखड्यानुसार या प्रकल्पाचा खर्च जवळपास १३ हजार कोटी रुपये निश्चित होता. मात्र नियोजनानंतर सुमारे चार वर्षे हा प्रकल्प थंडबस्त्यात गेला. मागीलवर्षी प्रकल्प उभारणीसाठी निविदा काढण्यात आली. निवीदा प्रक्रिया सुरू असतानाच एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा बांधकाम खर्च १५ हजार २६४ कोटी रुपये निश्चित करण्यात आला होता. प्रत्यक्षात बांधकामाचे कंत्राट १४ हजार ४०१ कोटी रुपयांना यावर्षी जून महिन्यात देण्यात आले. परंतु आता वन विभागासंबंधीच्या लालफितीशाहीमुळे अद्यापही या बोगदामार्गाचे काम सुरू झालेले नाही.

हा बोगदा ठाणे ते बोरिवलीदरम्यान ५.७४ किमी व बोरिवली ते ठाण्यादरम्यान ६.०९ किमी लांबीचा आहे. दोन्हीकडील जोडरस्ता १.५५ किमीचा असेल. जवळपास १० किमीचा मार्ग अभयारण्याच्या २५ मीटर खालून जाणार आहे. त्यासाठीच्या परवानगीचा प्रस्ताव एमएमआरडीएने मे, २०२३ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दिला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात केंद्राकडे पाठवला. आता केंद्राची मंजुरी येईपर्यंत पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कंत्राटदाराकडून यंत्रसामग्रीची जुळवाजुळव

या बोगदा बांधकामाचे कंत्राट मेघा इंजिनीअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला जून, २०२३मध्ये देण्यात आले. त्यानंतर कंत्राटदाराने बोगदा खणण्यासाठी यंत्रसामग्रीची जुळवाजुळव सुरू केली आहे. चीन येथून दोन मोठे टीबीएम (टनेल बोरिंग यंत्र) मागविण्यात आले आहे. तसेच टीबीएम डोंगरावरून खाली सोडण्यासाठी आवश्यक असलेली सामग्रीदेखील सज्ज केली आहे. बोरिवली बाजूने वन भाग नसलेल्या ठिकाणी सर्वेक्षण सुरू झाले आहे. तेथेच काँक्रीट मिश्रणाचा प्रकल्पदेखील उभा करण्यात आला आहे.

मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, लोअर परळचा बहुप्रतीक्षित पूल पूर्ण क्षमतेने खुला होणार, मुहूर्त ठरला

प्रकल्प असा

ठाणे-बोरिवली : ५.७४ किमी

बोरिवली-ठाणे : ६.०९ किमी

दोन्हीकडे जोडरस्ता : १.५५ किमी

ठाणे-बोरिवली खर्च : ७४६४ कोटी रु. (मेघा इंजिनीअरिंगची बोली)

बोरिवली-ठाणे खर्च : ६९३७ कोटी रु. (मेघा इंजिनीअरिंगची बोली)

भूसंपादन खर्च : ७०० कोटी रु.

आकस्मिक खर्च : ३७५.४० कोटी रु.

अन्य सेवा : २६१ कोटी रु.

एकूण खर्च : १५ हजार ७३७ कोटी रु.

वाहनांना लाभ : दररोज सरासरी दीड लाख

एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद; राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed