काय आहे प्रकरण?
वरळी कोळीवाड्यात मैत्रिणींसोबत राहणारी आकांक्षा एका एजन्सीमध्ये हाऊस किपिंगचे काम करते. याच एजन्सीमध्ये काम करणाऱ्या अनेकजणी एकाच खोलीत राहतात. आकांक्षा गर्भवती असल्याचा संशय तिच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणींना आला. याबाबत त्यांनी आकांक्षाला विचारल्यानंतर पोटामध्ये दोन ट्युमर असल्याचे तिने सांगितले. ९ सप्टेंबरला आकांक्षा वारंवार बाथरूममध्ये जात असल्याने इतर मैत्रिणींनी तिला हटकले. मात्र, खाण्यामध्ये मिरची आल्याने आपल्याला त्रास होत असल्याचे तिने सांगितले. रात्रीच्या वेळेस बाथरूममध्ये गेलेली आकांक्षा जवळपास तीन तासांनी बाहेर आली. याबाबत तिला एका मैत्रिणीने विचारले असता, ट्युमर फुटल्याने रक्तस्राव झाल्याचे तिने सांगितले. त्यानंतर या मैत्रिणीने बाथरूमध्ये जाऊन पाहिले असता, तिथे एक मृतावस्थेतील बाळ कपड्यामध्ये बांधलेले तिला आढळले.
एजन्सीचा मॅनेजर जमालउद्दीन याच्यासोबत आकांक्षा हिने दुसऱ्या दिवशी संपर्क केला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्याने या बालकाची व्हिलेवाट लावण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आकांक्षाने एका पिशवीमध्ये या बालकास भरून घराबाहेर पडली. त्यानंतर दोघे वांद्रे खाडी येथे गेले आणि खाडीत त्यांनी या बालकास फेकून दिले. हे नवजात बालक सापडल्यानंतर या बालकाला फेकणाऱ्या व्यक्तींचा पोलिसांनी शोध सुरू केला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस वरळी कोळीवाडा परिसरात पोहोचले. त्यानंतर हा सर्व प्रकार आणि घटनाक्रम समोर आल्यानंतर आकांक्षा आणि जमालउद्दीन यांच्या विरोधात दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.