• Fri. Mar 13th, 2026

    वीज मागणीचा उच्चांक, उकाड्यामुळे राज्याची वीज मागणी २४,६०० मेगावॉटवर, मुंबईकरांनी किती वीज वापरली?

    वीज मागणीचा उच्चांक, उकाड्यामुळे राज्याची वीज मागणी २४,६०० मेगावॉटवर, मुंबईकरांनी किती वीज वापरली?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि राज्याच्या वीज मागणीने बुधवारी (ता. ११) उच्चांक गाठला. वाढता उकाडा आणि तापलेल्या उन्हामुळे दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान राज्याची वीज मागणी २४ हजार ६०० मेगावॉट, तर मुंबईची वीज मागणी ३६०० मेगावॉटवर होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी जलसाठा मर्यादित असतानाही जलविद्युत प्रकल्पातून सर्वाधिक क्षमतेने वीजनिर्मिती केली गेली.

    राज्यभरात महावितरणकडून व मुंबईत तीन कंपन्यांकडून वीज वितरण केले जाते. ऑक्टोबरमध्ये एरव्ही राज्याची वीज मागणी अधिकाधिक २३ हजार ८०० ते २४ हजार मेगावॉटदरम्यान असते. मात्र, मागील आठवडाभरापासून राज्यातील (महावितरण) वीज मागणी सातत्याने २४ हजार मेगावॉटच्या वर असताना, बुधवारी ती २४ हजार ६०० मेगावॉटवर पोहोचली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीने ७ हजार मेगावॉटहून अधिक औष्णिक (कोळसाआधारित) वीज उत्पादन केले. तर कोयना येथील जलाशय ९० टक्केच भरले असतानाही तेथील जलविद्युत प्रकल्पातून क्षमतेच्या ७० टक्क्यांहून अधिक म्हणजेच, १४७७ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती करण्यात आली. मागील आठवड्यापर्यंत ही निर्मिती जेमतेम ३०० मेगावॉटदरम्यान होती.

    दुसरीकडे, मुंबईच्या मागणीने ३,६०१ मेगावॉटचा उच्चांक ऑक्टोबरमध्ये गाठला. याआधी ऑक्टोबरमध्ये मुंबईची मागणी ३,४०० मेगावॉटदरम्यानच होती. बुधवारी ३,६०१ मेगावॉटची मागणी पूर्ण करताना जलविद्युत प्रकल्पांमधूनदेखील क्षमतेच्या जवळपास ८० टक्के निर्मिती करण्यात आली. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित जलाशयांमध्ये सरासरी ८६ टक्के साठा आहे. त्यामुळे तेथील वीजनिर्मिती कमी करण्यात आली होती. मात्र, बुधवारी वाढत्या मागणीसह त्यातही वाढ करण्यात आली आहे, हे विशेष.

    – कमी जलसाठा असतानाहीकोयना प्रकल्पात ७० टक्के वीजनिर्मिती

    – मुंबईसाठीचे जलविद्युत प्रकल्पदेखील ९० टक्के क्षमतेने

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed