• Sat. Sep 21st, 2024

जीवघेणा हल्ला झाला, जखमा ताज्या पण हौसला बुलंद, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी पुन्हा शाळेत

जीवघेणा हल्ला झाला, जखमा ताज्या पण हौसला बुलंद, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी पुन्हा शाळेत

अहमदनगर : माझ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे माझ्यावर काहीच फरक पडणार नाही. जखमा भरून येत आहेत. उद्यापासून (गुरूवार) मी पुन्हा शाळेत कामावर जाणार आहे. माझे काम सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार शिक्षणतज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

निर्भय बनो अभियानाचे संकल्पक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी आज नगरला येऊन कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी आहे. सरकारनेच हा कायदा केला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. ती होणार नसेल तर हा कायदाच रद्द करा. यासाठी संघर्ष करीत असलेल्या कुलकर्णी यांना हल्ल्याला समोरे जावे लागले.

गेली ३५ वर्षे कुलकर्णी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या बाबतीत ही घटना घडत असेल तर सामान्यांची काय परिस्थिती असेल. यामध्ये पोलिसांनी गांभीर्याने तपास केला पाहिजे. याचे नेमके कारण, आरोपींच्या मागे आणखी कोणी आहे का? याचा तपास केला पाहिजे. पोलिसांना आपल्या हद्दीत राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती हवी. पोलिसांचा त्यांच्याशी संपर्क असला पाहिजे. यासाठी पोलिसांसाठी प्रशिक्षणवर्ग घेण्याची गरज आहे. कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याची घटना ‘निर्भय बनो’च्या कार्यकर्त्यांमुळे उजेडात आली. हे अभियान कसे काम करू शकते याचे उत्तम उदाहरण नगरच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. पोलिसांनी या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. मात्र, दुर्दैवाने हप्ते खाण्याचे माध्यम म्हणून याकडे पाहिजे जाते की काय असा संशय येतो. या गुंडाना पोसण्यासाठी पिढ्या बिघडल्या तरी चालेल, असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी असे कायदेच रद्द करावे, असेही चौधरी म्हणाले.

हेरंब कुलकर्णींवर जीवघेणा हल्ला; सुप्रिया सुळेंनी घरी जाऊन भेट घेतली, गृहमंत्री फडणवीसांवर संतापल्या!

यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले, या हल्ल्यानंतर कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमे धावून आली. हेच माझे बळ आहे. त्यामुळे मला या हल्ल्याचे काहीच वाटत नाही. आचार्य अत्रे यांच्यावर पुण्यात हल्ला झाला तेव्हा ते म्हणाले होते, मला मारणारा मेले, मी जिवंत आहे. तशीच भावना आज माझी आहे. त्यामुळे उद्यापासून मी पुन्हा शाळेत जाणार आहे. माझे काम सुरूच करणार आहे. त्यातील एक पानटपरी अद्यापही नियम मोडून सुरूच आहे. ती हटविण्यासाठी पुन्हा पाठपुरावा सुरू करणार आहे. अशा घटना घ़डण्यामागे कुटुंब संस्था आणि आमचे सामाजिक संस्था याचेही अपयश आहे. आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यास, किमान वाईट गोष्टी करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरत आहोत. रात्री अपरात्री बाहेर जाणाऱ्या मुलांना पालक जाब विचारत नाही. त्यामुळे शिकूनही मुले निरक्षर राहण्याचा मोठा धोका आहे. त्यांच्याच संवेदनशीलता, जबाबदारी रुजू शकणार नाही. यासाठी राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर एकत्र येऊन विचार केला पाहिजे, असेही कुलकर्णी म्हणाले.

उरलेल्या दोन आरोपींना अटक:

कुलकर्णी यांच्या हल्लाप्रकरणातील पाचपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली होती. आता उरलेले दोघेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. सनी ज्ञानेश्वर जगधने (वय २४ रा. रंगभुवन, सर्जेपुरा) व अक्षय कैलास माळी (वय २० रा. घासगल्ली, कोठला) यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. शाळेजवळीव टपरी हटविल्याच्या रागातून आरोपींनी हा हल्ला केला. ऑगस्टमध्ये कुलकर्णी यांच्या पत्रावरून महापालिकेने ही कारवाई केली होती. तेव्हापासून आरोपींचा कुलकर्णी यांच्यावर राग होता. यापूर्वी त्यांनी २० सप्टेंबरला कुलकर्णी यांच्यावर शाळेजवळच हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नव्हते, अशी माहिती आता चौकशीतून पुढे येत आहे.

घरात आगीचा भडका,चचाने कुटुंबीय गावात आरतीला गेल्यानं वाचले, घरी येईपर्यंत सर्व संपलं, उरले फक्त अंगावरील कपडे

Read Latest Ahmednagar News and Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed