• Sat. Sep 21st, 2024
‘एक गाव, एक गणपती, एक गणेशोत्सव’, महाराष्ट्रातील ‘या’ गावात अनोखी परंपरा

रायगड : कोकणात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो यासाठी घरातील मंडळी मुंबई पुणे अथवा अन्य कुणीकडे बाहेर असली तरी ती गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होत असतात. गणेशोत्सवाची मोठी परंपरा कोकणाला आहे. मात्र, कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गावांमध्ये आगळ्यावेगळ्या परंपरा गेले कित्येक वर्ष जोपासल्या जात आहेत. रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील साले या गावात गणेशोत्सवाची आगळी वेगळी म्हणजेच ‘एक गाव एक गणपती’ परंपरा आहे. या गावात घरोघरी गणपती आणला जात नाही.

गावात श्री. शंकराचं स्वयंभू देवस्थान आहे. याच ठिकाणी श्री. गणेशाची छोटी मूर्ती विराजमान आहे. याच गणेशमूर्तीची पूजा गणेशोत्सवाच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढून दरवर्षी घरोघरी पूजनासाठी नेली जाते. देवळाजवळच असलेल्या गंगासागर तलावातून ही पालखी मिरवणूक देवळात येते. त्यानंतर देवळातील पूजा झाल्यानंतर ही पालखी घरोघरी फिरते आणि एकाच दिवसात गणेश उत्सव या गावात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. विशेष म्हणजे कितीही जोराचा पाऊस असला तरी या तलावातूनच ही मिरवणूक देवळात आणण्याची प्रथा आहे. पालखीचे चार खूर पाण्याच्या मध्यभागी देवाचे स्थान असलेल्या ठिकाणी लावून लाडक्या गणपती बाप्पाची ही मिरवणूक श्री. स्वयंभू शंकराच्या देवळात आणली जाते. लहानग्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळेच या मिरवणुकीत सहभागी होतात. ही परंपरा गावात आज जवळपास ३५० वर्ष जपली जात आहे, अशी माहिती येथील ग्रामस्थ पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर यांनी दिली.

शरद पवारांना तगडा झटका, एकाच जिल्ह्यातील आमदार-खासदार साथ सोडणार, दादांना प्रतिज्ञापत्रही दिलं!
तळकोकणातील “कोईळ ” गावही जपतोय ऐतिहासिक परंपरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कोईळ गावाला देखील ऐतिहासिक वारसा आहे. मात्र, कोईळ गावामध्ये ‘एक गाव एक गणपती’ गेले ६०० वर्षांपासून ऐतिहासिक संकल्पना राबवली जात आहे. या गावामध्ये गणेश चतुर्थीला प्रत्येकाच्या घरी गणेश मूर्तीचं पूजन केलं जात नाही. ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. या गावातील गणपती मंदिरातील काळ्या दगडाची गणेशमूर्ती गणेश चतुर्थीच्या काळात सजवली जाते. त्यानंतर त्याच शिधामधून गणेश चतुर्थीच्या काळामध्ये सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो.

गणेश चतुर्थीच्या काळामध्ये घरामध्ये कोणतीही मूर्ती किंवा प्रतिमा लावली जात नाही. तसेच सत्यनारायणाची पूजाही याच मंदिरात घातली जाते. गणेशोत्सवाचे ११ दिवस मोठ्या आनंदाने गाव एकत्र येऊन साजरा करतो. लग्न पत्रिकेमध्ये देखील गणपतीचे चित्र छापलं जात नाही. गणपती हे श्रद्धास्थान आहे. गणराया विघ्नहर्ता आहे. त्याची कुठेही विटंबना होता कामा नये. त्याचं पावित्र्य राखले जावे, यासाठी गावातील लग्नपत्रिकेमध्ये गणपतीचा फोटो देखील छापला जात नाही. हे या गावाचा एक खास वैशिष्ट्य आहे.

मात्र, आगळीवेगळी प्रथा परंपरा जोपासणारा हे तळकोकणातील गाव शासनाच्या अनेक सुविधांपासून आजही वंचित आहे, अशी खंत येथे स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करतात. तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील पीसई गोपाळवाडी येथे ‘एक वाडी एक गणपती’ ही मोठी परंपरा ग्रामस्थ मोठ्या भक्ती भावाने जपत आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती किंवा गणपती मूर्त्या कशा असाव्यात, कोणत्या मातीच्या असाव्यात यावर अनेक नियम कायदे केले जातात. मात्र, कोकणातील काही गाव या सगळ्याला अपवाद आहेत. गणेशोत्सव मोठ्या आनंदाने एकत्र येऊन साजरा करतात. मात्र, या गावांना नियम व कायद्यांची विचार करण्याची गरजंच आजवर कधी पडली नाही, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनस्थळी गोंधळ; गणेश भक्तांची स्वयंसेवकांना दमदाटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed