मुंबईचा विमानतळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. सुरुवातीला या विमानतळाला सांताक्रूझ किंवा सहार विमानतळ म्हणून ओळखले जात होते. या विमानतळाच्या धावपट्टीवर किंवा विमानतळाच्या आकाशात आतापर्यंत १२ मोठे अपघात झाले आहेत. त्यातील सहा अपघात हे पावसाळ्यातील आहेत. यात तीन अपघात धावपट्टीवर झाले आहेत. धावपट्टीवर झालेल्या अपघातांमधील पहिला अपघात १९ जुलै १९५९ रोजी झाला. त्यामध्ये लॉकहिड मार्टिन कंपनीचे सुपर कॉन्स्टेलेशन हे विमान धो-धो पावसात धावपट्टीवरून घसरले. सुदैवाने जीवितहानी न होता ४६ प्रवासी बचावले. २१ जून १९८२ रोजी ‘एअर इंडिया ४०३’ हे विमान कौलालम्पूर-मद्रासहून येताना पावसात धावपट्टीवर कोसळले. १११पैकी १९ जण ठार झाले. १ जुलै २०१९ ला पाऊस सुरू असताना रात्रीच्या अंधारात स्पाइटजेटचे विमान घसरून चिखलात रूतले. जीवितहानी झाली नाही.
पावसाळ्यातील अन्य तीन दुर्घटना अधिक भीषण होत्या. १२ जुलै १९४९ला पाऊस सुरू असताना लॉकहिड एल २४९ कॉन्स्टेलेशन हे विमान धावपट्टीकडे येताना घाटकोपर-पवईदरम्यान टेकडीवर कोसळले. त्यात विमानातील सर्व ४४ जण ठार झाले. २८ जुलै १९६३ला ‘यूएई ८६९’ हे टोक्यो-मुंबई-कराची-कैरो जाणारे विमान धावपट्टीकडे येताना पावसामुळे दृष्यता खालावून अरबी समुद्रात कोसळून ६३ जण ठार झाले. ४ ऑगस्ट १९७९ रोजी ‘हॉकर सीडले ४१’ हे विमान धावपट्टीकडे येताना पावसाळ्यातील खराब वातावरणामुळे टेकडीवर कोसळले. त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त विमानाचे भाग उचलले
गुरुवारी सायंकाळी अपघातग्रस्त झालेल्या लीअरजेट विमानाचे तुटलेले भाग प्रशासनाने शुक्रवारी तातडीने उचलून नेले. अपघातानंतर सुमारे दोन तास धावपट्टी बंद ठेवून हे भाग धावपट्टीपासून दूर नेण्यात आले होते. ते उलचण्यासाठी विशेष सामग्रीची गरज असते. ती सामग्री फक्त एअर इंडियाकडे आहे. हे भाग उचलण्याची प्रक्रिया सुरू असताना शुक्रवार, १५ सप्टेंबरला दुपारी २ ते सायंकाळी ७दरम्यान वैमानिकांना विशेष दक्षतेची सूचना (नोटम) देण्यात आली होती.