• Sat. Sep 21st, 2024

Palghar News: चिंचपाडा एसटीला भीषण अपघात; ४७ विद्यार्थ्यांसह ८ प्रवासी जखमी

Palghar News: चिंचपाडा एसटीला भीषण अपघात; ४७ विद्यार्थ्यांसह ८ प्रवासी जखमी

म. टा. वृत्तसेवा, वाडा : ट्रक आणि भरधाव एसटी बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात जवळपास ४० प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिंचपाडा येथून वाड्याच्या दिशेने येणाऱ्या या बसला देसई गावाजवळ हा अपघात झाला. जखमींमध्ये अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

काय घडलं?

एसटी महामंडळाची बस सेवा खरे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र वाडा तालुक्यामध्ये सध्या या सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला दिसत आहे. चिंचपाडा येथून शिलोत्तर, पीक मार्गे वाडा येथे जाणारी बस देसई येथे खोडाळा रस्त्यावरून जाणाऱ्या एका ट्रकला अत्यंत वेगाने जाऊन थेट धडकली. यावेळी बसमध्ये ६१ प्रवासी होते. अचानक धडक बसल्याने अनेक प्रवासी समोरच्या आसनांवर धडकले, तर काही एकमेकांवर आदळले. बसमधील ३५ ते ४० विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले. यात अनेकांच्या हातापायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. वाडा ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करून, यातील जवळपास २५ जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तेजू घाटाळ या जखमी विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी ठाणे येथे पाठवण्यात आले आहे. बसचालक शंकर सोनकांबळे हादेखील अपघातात जखमी झाला आहे.

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. जिल्हा परिषद सदस्या भक्ती वलटे यांनी स्वतः रुग्णांना उपचारात मदत केली.

पालक संतप्त

इतकी मोठी घटना घडूनही वाडा आगार व्यवस्थापक तब्बल अडीच तास उशिरा रुग्णालयात दाखल झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. बेजाबदारपणे बस चालवणाऱ्या चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी पालक कमलाकर भोईर यांनी केली. या अपघातामुळे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीद वाक्यालाच एसटीने काळीमा फासल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.
करंजाळीजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ४ जण ठार
आरोग्य यंत्रणा कोलमडली

वाडा ग्रामीण रुग्णालयाची अवस्था आधीच अतिशय गंभीर असून, बसला झालेल्या या अपघातानंतर जखमींवर उपचार करताना आरोग्य विभाग अक्षरशः कोलमडून पडल्याचे दिसले. पुरेसे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच औषधोपचार या ठिकाणी उपलब्ध नसल्याने अनेक जखमींना थातूरमातूर उपचार करूनच घरी जाण्याची वेळ आली. काहींनी थेट खासगी रुग्णालयाची वाट धरली. एक्स-रेसारखी सुविधा वेळेत मिळाली नसल्याचे पालकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed