गोपीचंद पडळकर यांच्या या विधानानंतर कधीकाळी पडळकर यांचे सहकारी आणि मित्र राहिलेले शिवसेनेचे (उ.बा.ठा) प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी पडळकरांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. गोपीचंद पडळकर हे माझे मित्र आहेत. ते माझे चळवळीतील सहकारी आहेत. गोपीचंद पडळकर तुम्ही ज्यावेळेस मागणी करत होता, त्यावेळेस तुम्ही बिरोबाची शपथ घ्यायला लावली. दहा वर्षात तुम्ही शपथ पूर्ण करू शकला नाहीत. आज जर एखादा कार्यकर्ता ती मागणी करत असेल आणि भंडारा प्रतीक म्हणून वापरत असेल तर त्याची तुम्हाला अडचण काय? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला आहे.
‘गोपीचंद पडळकर तुम्ही आता बोला. तुम्ही या सगळ्यांचा फायदा घेतला, तुम्ही आमदार झाला, तुम्ही पदं उपभोगली मात्र समाज अजूनही उपेक्षित आहे. तुम्ही अधिवेशनात धनगर समाजासाठी २० हजार कोटी रुपयांची घोषणा केली, मात्र त्याचा एक रुपया देखील दिला नाही,’ असा घणाघात देखील हाके यांनी पडळकर यांच्यावर केला आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्रातले वारकरी असतील, मराठा समाज असेल किंवा धनगर समाज असेल, इतकंच काय तर महाराष्ट्रातील प्रत्येक समाजमन भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. याची सुरुवात आज झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं. देवेंद्र फडणवीस यांना आम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही. याची सुरुवात आज झालेली आहे,’ असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.