• Fri. Mar 13th, 2026

    शेतकऱ्यांनो, धान्य गहाण ठेवून कर्ज घेताय? सावधान; नागपूरात ११३ कोटींची फसवणूक उघड

    शेतकऱ्यांनो, धान्य गहाण ठेवून कर्ज घेताय? सावधान; नागपूरात ११३ कोटींची फसवणूक उघड

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : धान्य गहाण ठेवण्याच्या मोबदल्यात कर्जाची उचल करून १५१ शेतकऱ्यांची तब्बल ११३ कोटींनी फसवणूक करण्यात आली. ही धक्कादायक घटना मौदा येथे उघडकीस आली असून, मौदा पोलिसांनी १८पेक्षा अधिक जणांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.

    काय आहे प्रकरण ?

    रमण्णाराव मुसलिया बोल्ला, वीर व्यंकटरावर सत्यनारायण वाकलकुडी, महिंद्रा मुप्पू वारको, कॉर्पोरेशन बँकेचे व्यवस्थापक मन्शुराम पाटील (मृतक), संदीप जगनाडे व एनसीएमएल कंपनीचे तत्कालीन अधिकारी, रमण्णा बोला यांच्या विविध १२ कंपन्यांचे संचालक व अन्य, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फसवणूक झालेले शेतकरी मौदा, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील आहेत. बोल्ला हा प्रकरणाचा सूत्रधार असून, त्याची मौद्यात राइस मिल आहे. शेतकऱ्यांना धान्य गहाण ठेवल्याचा मोबदल्यात बँकेकडून कर्ज देण्यात येते. २०१७मध्ये जिल्ह्यात ओला दुष्काळ पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. बोल्ला याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळत असल्याचे सांगितले. त्याने साथीदारांच्या मदतीने एकामागून एक तब्बल १५१ शेतकऱ्यांना सदरमधील किंग्जवेवरील कॉर्पोरेशन बँकेत आणले. तेथे त्यांच्याकडून आधारकार्ड व पॅनकार्ड घेतले. त्यांचे खाते उघडले. बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून चेकबुक घेतले. त्यावर १५१ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन धनादेश स्वत:जवळ ठेवले. त्यानंतर बोल्ला व त्याच्या साथीदारांनी बनावट दस्तऐवजाद्वारे धान्याच्या मोबदल्यात कर्ज मिळविण्यासाठी बँकेत अर्ज केला. त्याआधारे तत्काळ शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. धनादेशाद्वारे विविध २४ खात्यांमध्ये कर्जाची रक्कम वळती करून शेतकऱ्यांची फसवणूक केली.

    अशी उघडकीस आली घटना

    काही दिवसांपूर्वी बँकेकडून वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली. कर्ज घेतले नसतानाही नोटीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शेतकऱ्यांनी बोल्लाला गाठले. नोटीस कशी मिळाली, याबाबत विचारणा केली. तुमच्या नावे घेतलेल्या कर्जाची रक्कम मी १२ कंपन्यांमध्ये जमा केली आहे. तुम्हाला व्याजासह काही दिवसांनी पैसे परत करतो, असे बोल्लाने शेतकऱ्यांना सांगितले. मात्र, त्याने शेतकऱ्यांना रक्कम दिली नाही व बँकेत कर्ज जमा केले नाही.

    शेती नसतानाही…

    फसवणूक झालेल्यांपैकी सहा जणांकडे शेती नाही. मात्र, बोल्ला व त्याच्या साथीदारांना ते शेतकरी असल्याचे दाखविले. बनावट दस्तऐवज व सातबारा तयार करून या सहा जणांच्याही नावे कर्ज घेतल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे.
    शेतकरी अपघात विम्याची रक्कम न देणे भोवले; ग्राहक आयोगाचा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला दणका
    मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. शिंदे यांनी पोलिस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. महासंचालकांनी तक्रारीची दखल घेत नागपूर ग्रामीण पोलिसांना विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून चौकशी करण्याचे निर्देश दिले. एसआयटीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली.त्यानंतर बुधवारी मौदा पोलिस स्टेशनमध्ये बोल्ला व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हेशाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed