• Sat. Sep 21st, 2024

पुरंदर विमानतळाचा प्रश्न २ महिन्यांत निकाली; उद्योगमंत्री उदय सामंतांची ग्वाही

पुरंदर विमानतळाचा प्रश्न २ महिन्यांत निकाली; उद्योगमंत्री उदय सामंतांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणारी सुमारे पाच हजार कोटींची रक्कम अदानी समूहाने देण्याची तयारी दर्शविली आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय अजून झालेला नाही. लवकरच एक बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल,’ अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. सामंत यांनी शुक्रवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला.

का रखडले विमानतळ?

– राज्य सरकारने पुरंदर तालुक्‍यातील सात गावांतील दोन हजार ८३२ हेक्‍टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा आठ वर्षांपूर्वी केली होती.
– केंद्र आणि राज्य सरकार; तसेच एअरपोर्ट ॲथॉरिटी, संरक्षण मंत्रालयाने जागेसाठी हिरवा कंदील दाखविला होता.
– भूसंपादनाचा मोबदला निश्‍चित करण्याबरोबरच प्रशासकीय तयारीही पूर्ण झाली होती. केवळ भूसंपादनाचा निर्णय प्रलंबित होता.
– या जागेवर होणाऱ्या विमानतळाला स्थानिक गावकऱ्यांनी आणि स्थानिक आमदार संजय जगताप यांनी विरोध दर्शविला.
– त्यामुळे नियोजित जागेच्या पूर्वेला दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागेचा प्रस्ताव पुढे आला होता.
– केंद्र सरकारकडून जागेला दिलेली परवानगी रद्द केल्याने, विमानतळाचा प्रश्‍न पुन्हा अधांतरी राहिला.

‘पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार आहेत. या जागेचे भूसंपादन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या दोन्हींपैकी नेमके कुणी करावे, यावर चर्चा सुरू आहे. भूसंपादनासाठी लागणारी रक्कम उपलब्ध करून देणे राज्य सरकारला शक्य नाही. ही रक्कम अदानी समूहाने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून, तसा प्रस्तावही दिला आहे. राज्य सरकार त्या निधीतून भूसंपादन करू शकते,’ असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

एमआयडीसी, विमानतळ कंपनी आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे निधी उभारण्यावरही विचार सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. ते परतल्यावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमची एकत्रित बैठक होणार आहे. सर्व शक्यतांचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. साधारणत: दोन महिन्यांत विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लागेल.- उदय सामंत, उद्योगमंत्री
पुणे रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेला वेग; किती शेतकरी देणार जमीन? काय सांगते आकडेवारी?
विमानतळाचा प्रश्न सुटणार?

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी निश्‍चित केलेल्या जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विमानतळाची गरज असल्याचे नुकतेच वेगवेगळ्या जाहीर कार्यक्रमात सांगितले. त्यामुळे विमानतळाचा प्रश्न लवकरच सुटण्याबाबत आशा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed