• Sat. Mar 14th, 2026

    ताडोब्यातील वन्यजीवांना मिळणार मोकळा अधिवास; ‘या’ शेवटच्या गावाचेही होणार पुनर्वसन

    ताडोब्यातील वन्यजीवांना मिळणार मोकळा अधिवास; ‘या’ शेवटच्या गावाचेही होणार पुनर्वसन

    चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअरमधील शेवटच्या रानतळोधी या गावाचे पुनर्वसन पुढील काही महिन्यात होण्याचे संकेत आहेत. मागील २३ वर्षांतील हा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. सदर प्रक्रिया यशस्वी झाल्यास ताडोब्यात वन्यजीवांना खऱ्या अर्थाने मोकळा अधिवास मिळणार आहे.

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वाधिक पर्यटकप्रिय व्याघ्र प्रकल्प आहे. वन्यप्राण्यांची सुरक्षितता लक्षात घेता प्रकल्पातील सर्व गावांचे पुर्नवसन करावे, असे मत कोअर झोनमध्ये असलेल्या गावांसाठी नेमण्यात आलेल्या समितीने व्यक्त केले होते. त्यानंतर २००० मध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत कार्यवाही करण्यास प्रारंभ केला. त्याच अंतर्गत ताडोबा प्रकल्पातील पुनर्वसनाची प्रक्रिया राबविली जात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एकूण सहा गावे होती. त्यातील २००७ मध्ये बोटेझरी गावाचे पूर्ण तर कोळसा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले. त्यानंतर एकापाठोपाठ एक गावाचे पुनर्वसन करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांना यासाठी विश्वासात घेतले गेले. एवढी मोठी प्रक्रिया राबविणे सहज शक्य नव्हते. वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ही बाब महत्त्वाची होती. चंद्रपूर जिल्ह्यासह ताडोबा व आसपास वाघांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पातील गावे लवकरात लवकर बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू आहे. तब्बल पाच गावे प्रकल्पातून बाहेर गेली असून ६११.५९ हेक्टर जागा मोकळी झाली आहे. त्या अंतर्गत प्रकल्पग्रस्त ९२४ कुटुंबांचे यशस्वी पुनर्वसन केले गेले आहे.

    काही गावकऱ्यांचा विरोध

    शेवटच्या रानतळोधी या गावातील २४४ कुटुंबांचे पुनर्वसन केले जात आहे. यातून ९९.५४ हेक्टर जागा वन्यजीवांसाठी मोकळी होणार आहे. ४० कुटुंबे बाहेर गेली असली तरी सुमारे २६ कुटुंबीयांचा बाहेर जाण्यास विरोध आहे. १२५ वर्षांपासून येथेच राहत असल्याने त्यांची भावना ही जागा सोडण्याची दिसत नाही. गावाचे पुनर्वसन करताना काही गावकऱ्यांचा विरोध बघता याला उशीर लागत आहे.
    चंद्रपूरातील वाघांची ‘सह्याद्री’त डरकाळी! ८ वाघांचे लवकरच स्थलांतर होण्याची शक्यता
    पुनर्वसन झालेली गावे
    वर्षे गावे क्षेत्र (हेक्टरमध्ये ) कुटुंब संख्या

    २००७ : बोटेझरी ६४.९१ ७९
    २००७ : कोळसा ३७.६७ ११८
    २०१३ : नवेगाव-रामदेगी १९४.८० २४०
    २०१४ : जामनी ११५.५६ २००
    २०१९ : पळसगाव शिंग्रू ६९.०७ १४५
    २०२२ : कोळसा १२९.५८ १४२

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed