• Sat. Sep 21st, 2024
Navi Mumbai: घाऊक बाजारात कांद्याची घसरण, लिलावबंदीचा परिणाम; मार्केटमध्ये कांदा एवढ्या रुपये किलो

नवी मुंबई : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिकसह अन्य बाजारपेठांमध्ये सोमवारी लिलाव बंद ठेवण्यात आला. या बाजारपेठांमध्ये जाणारा कांदा वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात आला. परिणामी कांद्याची आवक वाढल्याने सोमवारी घाऊक बाजारात कांद्याचे भाव १८ ते २२ रु. किलोपर्यंत घसरले होते. दरम्यान, वाशीतील कांदा-बटाटा बाजार गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

ऑगस्ट महिन्यापासून कांद्याचे भाव वाढायला सुरुवात झाली होती. घाऊक बाजारात ८ ते १२ रु. किलोपर्यंत असणारे कांद्याचे भाव दोन आठवड्यांत २५ ते २७ रु. किलोवर पोहोचले होते. त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा ३५ रु. किलो झाला होता. हे भाव गणेशोत्सवावेळी ५० रुपये किलोच्याही पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. एकीकडे भाव वाढत असताना कांद्याची निर्यातही सुरू होती. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला व्यापारी व निर्यातदारांनी विरोध दर्शवला आहे.

सत्ताधारी मंत्री आमदारांच्या निशाण्यावर एकनाथ खडसे, जळगावच्या डीपीडीसी बैठकीत टीकास्त्र, नेमकं काय घडलं?
निर्यातशुल्काच्या विरोधात सर्व ठिकाणच्या बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कांद्याचे भाव पडले तर कांद्याला जो काही भाव मिळतोय तोही मिळणार नाही या भीतीने सर्व शेतकऱ्यांनी कांदा मुंबई बाजारात पाठवून दिला. त्यामुळे सोमवारी वाशीच्या बाजारात कांद्याच्या १३५ गाड्यांची आवक झाली. इतरवेळी ही आवक ८० ते १०० इतकी असते. कांद्याची आवक वाढल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्या उपलब्ध झाला. तर, कांद्यावर निर्यातशुल्क लागू झाल्याने निर्यातदारांनी कांद्याची खरेदी थांबवली आहे.

परिणामी वाशी बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याचे चित्र होते. किरकोळ बाजारात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कांद्याची जेमतेमच खरेदी केली. सोमवारी कांद्याचा भाव किलोमागे पाच रुपयांनी कमी झाला. तो आणखी घसरू शकतो, अशी प्रतिक्रिया काही खरेदीदारांनी व्यक्त केली. मात्र, सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, यावर हे कांद्याचा भाव अवलंबून असेल, अशी माहिती घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.

Mumbai News: मुंबई, ठाण्यात न्यायविलंब, सर्वाधिक प्रलंबित फौजदारी खटले; वाचा सविस्तर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed