• Mon. Mar 9th, 2026

    आमदाराची बायको जीव देईल, गोगावलेंच्या किश्श्यामागील कारण काय? उदय सामंतांनी सगळं सांगितलं

    आमदाराची बायको जीव देईल, गोगावलेंच्या किश्श्यामागील कारण काय? उदय सामंतांनी सगळं सांगितलं

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एका आमदाराने मंत्रिपद न मिळाल्यास त्यांची पत्नी आत्महत्या करेल, तर एकाने मंत्रिपद न मिळाल्यास नारायण राणे आपल्याला संपवतील, असे विधान केल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी केला होता. मात्र हे वक्तव्य गोगावलेंनी विनोदातून केल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

    काय बोलले होते भरत गोगावले?

    एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊन जवळपास १४ महिने उलटले तरी अद्याप मंत्रिपदाच्या रांगेत असलेले ‘नाराज’ आमदार भरत गोगावले यांनी पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा किस्सा सांगताना आपल्याला मंत्रिपदाने कशी हुलकावणी दिली, याचे भन्नाट कथन अलिबागमधील एका कार्यक्रमात केले होते. मंत्रिपदासाठी माझाच नंबर पहिला होता, पण जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अडचणीत आले, तेव्हा मात्र मी माघार घेतली, असे सांगताना त्यावेळी पडद्यामागे नेमके काय घडत होते, याचे वर्णन त्यांनी केले होते.

    पहिल्या नऊ जणांच्या यादीत मला मंत्रिपद मला मिळणार होतं, मात्र आमच्यातील एका सहकारी आमदाराने सांगितलं, की मंत्रिपद मिळालं नाही, तर माझी बायको आत्महत्या करेल…. तर एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील…. तिसरा म्हणाला मला मंत्रिपद मिळाले नाही तर शपथविधीनंतर मी लगेच राजीनामा देतो… या सगळ्या प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अडचणीत आले होते, त्यामुळे मला मंत्रिपदासाठी थांबावे लागले, असा किस्सा भरत गोगावले यांनी सांगितला होता.

    मुंडे बहीण भावाच्या सगळ्या खाचाखोचा माहिती, धनुभाऊंचा खास दोस्त पवारांच्या गळाला कसा लागला?

    उदय सामंत काय म्हणाले?

    लोकशाहीत नेत्यांना सभा घेण्याचा अधिकार असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ठिकठिकाणी सभा घेणार म्हणून वाईट वाटण्याचे कारण नाही, अशा शब्दांत उदय सामंत यांनी पवारांबाबत बोलणे टाळले.

    ED Raids: शरद पवारांचा निष्ठावंत खजिनदार टार्गेटवर; आर्थिक रसद तोडणार? राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचा छापा
    दुसरीकडे केवळ दिल्लीला दाखविण्यासाठी काँग्रेस नेते अजित पवारांबाबत दावे करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. नाशिकला एका कार्यक्रमानिमित्त आले असता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    शरद पवार यांनी पुन्हा सभा सुरू केल्याबद्दल ते म्हणाले, की शरद पवार सभांमधून त्यांचे विचार मांडतील. अजित पवार त्यांचे विचार व्यक्त करतील, तर शिवसेना म्हणून आम्ही विचार मांडू. त्यानंतर कोणाला स्वीकारायचे हे लोक ठरवतील. हा लोकशाहीचा भाग आहे.

    संदीप, तुझी आजी आज आकाशातून आनंदाने बघत असेल, माझा नातू जिल्ह्याचा नेता झाला, आव्हाडांचं जोरदार भाषण
    शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना सामंत यांनी, येत्या लोकसभेत दोनतृतीयांश बहुमताने पुन्हा मोदीच येतील, असा दावा केला. पवारांवर टीका टाळताना सामंत यांनी काँग्रेसवर मात्र हल्लाबोल केला. ‘शरद पवार सोबत आले, तरच तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकाल,’ अशी अट मोदींनी अजित पवार यांनी घातली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व अन्य काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्याबाबत सामंत म्हणाले, की केवळ दिल्लीत नोंद व्हावी, यासाठी हे लोक असे बोलत असून, त्यांच्या मनात खरे वेगळेच सुरू आहे. ते मी तुम्हाला सवडीने सांगेन. काँग्रेसला लोकसभेच्या ४० जागा मिळणार असल्याच्या सर्वेक्षण निष्कर्षाचीही सामंत यांनी खिल्ली उडवली. ‘४० नव्हे, त्यांना ४८ जागा मिळतील,’ असे उपरोधाने म्हणत त्यांनी ज्यांना उमेदवार मिळत नाहीत त्यांनी ४० जागा मिळण्याच्या गोष्टी करणे म्हणजे कमाल झाल्याचेही ते म्हणाले.

    खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटल्याच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. या उपक्रमाच्या माध्यमातून सव्वाकोटी जनतेला लाभ झाला आहे. पुढील काळात हा उपक्रम आणखी जोरदार पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविला जाईल, असे सामंत म्हणाले.

    Shirdi News: एन्ट्रीलाच दिग्गजाला धूळ चारली, मग शिवबंधन तोडून काँग्रेसमध्ये, आता भाजपमधून वाकचौरे शिवबंधनात!

    तीन तासांत गाठले नाशिक!

    ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून केलेल्या टीकेवर सामंत म्हणाले, की ठेकेदाराच्या तांत्रिक अडचणींमुळे महामार्गाचे काम अर्धवट राहिले; परंतु गणेशोत्सवाआधी एका लेनचे काँक्रिटीकरण पूर्ण होईल. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांबाबत ते म्हणाले, की गेल्या वेळी नाशिकला येण्यासाठी साडेसहा तास लागले होते. यावेळी तीन तासांत आलो. महामार्गाचे काम सुरू असून, त्यात स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे आदी उपस्थित होते.

    बच्चू कडूंना निमंत्रण देणार

    मुख्यमंत्र्यांकडून स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू यांना निमंत्रण देण्यात आले नाही, याबाबत सामंत म्हणाले, की मी स्वत: त्यांना निमंत्रण देणार आहे. ते समजूतदार आमदार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed