• Sat. Sep 21st, 2024

ताटातील चपाती-भात स्वस्त होणार; महागाई नियंत्रणासाठी केंद्राकडून विशेष कोटा

ताटातील चपाती-भात स्वस्त होणार; महागाई नियंत्रणासाठी केंद्राकडून विशेष कोटा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : केंद्र सरकारी कोट्यातून सरासरी ३० रुपये किलो दराने गहू व ३५ रुपये दराने तांदूळ उपलब्ध होण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. यासाठी केंद्रीय अन्नधान्य व वितरण मंत्रालयाने विशेष कोटा बाजारात आणला आहे. महागाई नियंत्रणासाठी या धान्याचा साप्ताहिक लिलाव होत आहे.

देशाच्या खाद्यान्न महागाई दराने जुलैअखेरीस आठ टक्क्यांचा आकडा गाठला आहे. त्यात महिनाभरात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रामुख्याने भाज्या व धान्य दरातील वाढीमुळे महागाई दर वाढला आहे. ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय अन्नधान्य व वितरण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. याबाबत मुंबईतील अन्नधान्य वितरण कार्यालयातील सूत्रांनुसार, केंद्र सरकारने त्यांच्या ताब्यात असलेला गहू व तांदळाचा कोटा बाजारात खुला केला आहे. याअंतर्गत ३.६८ लाख टन गहू व १.६५ लाख टन तांदळाचा समावेश आहे. खुल्या बाजारातील विक्री योजनेंतर्गत लिलावाद्वारे हा कोटा बाजारात आणला जात आहे. यामुळे अतिरिक्त माल बाजारात येईल व किमती कमी होण्यास मदत मिळेल.

केंद्र सरकारकडून दर बुधवारी ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होतो. तीन लाख ६८ हजार १४३ टन गहू व १.६५ लाख टन तांदळासाठीची ही लिलाव प्रक्रिया आहे. अधिकाधिक धान्यसाठा बाजारात यावा, यासाठी घाऊक विक्रेते, मिल मालकांसह तांदळाच्या व्यापाऱ्यांनीदेखील यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्राने केले आहे. आतापर्यंतच्या सात लिलाव प्रक्रियांत एक लाख २९ हजार ९४३ टन गहू व २३० टन तांदळाची प्रक्रिया पार पडली असून, त्यातील एक लाख पाच हजार ३५४ टन गहू व २१० टन तांदळाची घाऊक व्यापारी, मिलर्स व अन्य व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष उचल केली आहे.

गहू, तांदळाची मागणी

भारतात गहू हे रब्बी हंगामातील पीक आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार, दर वर्षी सरासरी ३.५० कोटी टन गव्हाचे उत्पादन होते. त्या तुलनेत मागणी १०.८० कोटी टन इतकी असते. खरिपात तयार होणाऱ्या तांदळाची देशातील मागणी १०.२० कोटी टन इतकी आहे. त्या तुलनेत उत्पादन १५ कोटी टनादरम्यान असते. यंदाच्या खरिपातील पेरण्यांत पाच टक्क्यांची वाढ आहे. मात्र, ते पीक बाजारात येण्यास आणखी सहा महिन्यांचा कालावधी असेल.
गोंदियातील ३३ मिलर्स काळ्या यादीत; निकृष्ट तांदळाचा पुरवठा केल्याने ३ वर्षांकरिता कारवाई
दराचे गणित

लिलावात आतापर्यंत मध्यम दर्जाच्या गव्हाची केंद्र सरकारने २१५० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री केली आहे. विशेष जीवनसत्व असलेला तांदूळ २९७३ रुपये आणि मध्यम दर्जाचा तांदूळ २९०० रुपये प्रति क्विंटलने विक्री करण्यात आला आहे. या दोन्ही धान्यांवरील प्रक्रिया व किरकोळ बाजारापर्यंतचा वाहतूक खर्च अधिकाधिक एक हजार रुपये प्रति क्विंटल येतो. त्यानुसार हे धान्य ३० ते ३५ रुपये किलोने लवकरच खुल्या बाजारात किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल. ही प्रक्रिया ऑनलाइन असल्याने प्रशासनाची त्यावर देखरेख असेल; तसेच अधिक साठा बाजारात आल्याने किमती कमी होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed