• Thu. Mar 12th, 2026

    POK जिंकणे भारतीय लष्करास शक्य; सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्त्व करणाऱ्या अधिकाऱ्याचं वक्तव्य

    POK जिंकणे भारतीय लष्करास शक्य; सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्त्व करणाऱ्या अधिकाऱ्याचं वक्तव्य

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर जिंकणे लष्कराच्या दृष्टीने शक्य आहे. परंतु त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, हे निश्चित. ही किंमत किती असेल, हे ठरल्यास अशक्य काहीच नाही’, असे परखड मत निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. प्रबोधन मंच पार्लेमध्ये आयोजित व्याख्यानात त्यांनी भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासापासून ते विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

    भूदलाने सप्टेंबर २०१६मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे निंभोरकर हे मुख्य नियोजनकर्ता होते, तो हल्ला त्यांच्याच नेतृत्वात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या व्याख्यानात त्यांनी देशाच्या लष्कराने लढलेले युद्ध व त्याची फलनिष्पत्ती, देशाच्या शस्त्रसामग्रीची सज्जता व उत्पादन स्थिती, सर्जिकल स्ट्राइकनंतर बदललेली मानसिकता व थिएटर कमांड; अग्निवीर योजना यावर त्यांनी भाष्य केले. पाकिस्तानव्याप्त काश्मिर जिंकणे अशक्य नसल्याचे मत मांडत तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होणे अशक्य नसल्याचे ते म्हणाले. ‘या आधीच्या सर्व युद्धात लष्कराने अतुलनीय पराक्रम गाजवला. त्या प्रत्येकवेळी चीन असो वा पाकिस्तान, शत्रूला मोठा दणका देता आला असता. मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तसे ठोस निर्णय घेतले नाहीत’, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.

    बालाकोट सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते: माईक पोम्पेओ

    निंभोरकर यांनी यावेळी ‘मेक इन इंडिया’वर भाष्य करीत संरक्षण सामग्रीखरेदीतील लालफितीशाहीवर तीव्र खंत व्यक्त केली. ‘२०१६मध्ये मेक इन इंडिया येण्याआधी आपण ४५ हजार कोटी रुपयांची सामग्री आयात करीत होतो. आज २३ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रींची निर्यात करीत आहोत. तरीही संरक्षण सामग्रीखरेदीला परवानगी देणारे संरक्षण सचिव हे संरक्षण दलातील नसल्याने या खरेदीला विलंब होतो. मनोहर पर्रिकर यांच्यासारखे सर्वोत्तम संरक्षणमंत्री लाभल्याने हे चित्र आता बदलत आहे’, असे त्यांनी नमूद केले. ‘कारगिल युद्धावेळी तिन्ही दलांमधील सहकार्याचा अभाव प्रकर्षाने पुढे आला. त्यामुळेच सैन्यदलप्रमुखाची गरज जाणवली व ते पद प्रत्यक्षात येण्यास २०२० उजाडले. त्यानंतर आता तिन्ही दलांचे स्रोत एकत्रित करून संयुक्त प्रमुखाचे थिएटर कमांड उभा होत आहे. परंतु अद्यापही ते पूर्णत्वास गेलेले नाही’, असे ते म्हणाले.

    अन्यथा पाकिस्तानवर पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’

    सर्जिकल स्ट्राइकची प्रेरणा छत्रपतींपासून

    सर्जिकल स्ट्राइकसाठी २१ सप्टेंबरला सकाळी मनोहर पर्रिकर यांनी हिरवा कंदिल दिला. मात्र या नियोजनामागील प्रेरणा व तयारी ही पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणावर आधारलेली होती, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

    चीनची हिंमत खुंटलेली

    डोकलामवेळी भारतीय लष्कराने २५ हजार सैनिकांच्या तैनातीची तयारी केली होती. त्यानंतर चीनने तेथून माघार घेतली. गलवानमध्ये चीनच्या आगळीकीला जबर धक्का देण्यात आपण यशस्वी ठरलो. त्यामुळेच त्यानंतर चीनने अद्याप अशी हिंमत केलेली नाही, असे ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed