देसाई यांच्या पत्नींनी खालापूर पोलीस ठाण्यात कर्ज देणाऱ्या कंपन्यांविरोधात देसाई यांच्या निधनानंतर तक्रार दाखल केली. या नंतर कर्ज देणारी एडलवाईजएआरसी या कंपनीने खुलासा केला आहे. कंपनीने कर्जवसुलीचे आरोप फेटाळून लावले असले तरी देखील त्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून कंपनीनेच कर्ज दिले आणि वसुलीसाठी थकित मालमत्ता विकत घेण्याचं काम या कंपनीने केल्याचं म्हटलं आहे.
सत्यजीत तांबे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘धक्कादायक म्हणजे, नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात, त्यांना कर्ज देणारी ESL फायनान्स आणि थकीत कर्जाची मालमत्ता विकत घेणारी Edelweiss Asset Reconstruction Company (ARC) या दोन्ही एकाच #Edelweiss Group च्या आहेत.
हे बँकिंग नियमांच्या विरुद्ध आहे. एकीकडे, सावकार कर्जदाराला त्रास देतो असे दिसते आणि दुसरीकडे ते कर्जदाराची मालमत्ता स्वतः विकत घेतात.
त्यामुळे सरकारने अशा बाबींची बारकाईने छाननी करून अशा प्रकारची छळवणूक होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.’
काय आहे कंपनीचं म्हणणं?
एडलवाईज कंपनीने काल शुक्रवारी संध्याकाळी या आरोपांसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन केलेलं आहे. नितीन देसाई यांना २५२ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. परंतु, त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता, तसेच त्यांना कर्जावर जास्त व्याजदर देखील आकारले गेलेला नव्हता, असे कंपनीने म्हटले आहे.