• Sat. Sep 21st, 2024

कल्याण-डोंबिवलीमध्ये यंदाचा पहिला ‘खड्डेमृत्यू’; ३ वर्षांपासूनचे रेकॉर्ड, चूक कोणाची?

कल्याण-डोंबिवलीमध्ये यंदाचा पहिला ‘खड्डेमृत्यू’; ३ वर्षांपासूनचे रेकॉर्ड, चूक कोणाची?

म. टा वृत्तसेवा, कल्याण : दरवर्षीच्या पावसाळ्यात किमान एका तरी नागरिकाचा खड्ड्यात बळी जाण्याचा जणू दुर्दैवी प्रघातच कल्याण-डोंबिवली परिसरात पडला आहे. शहरात यंदा सूरज गवारीच्या रूपाने पहिला बळी गेला आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दरवर्षी किमान एक तरी नागरिक खड्ड्यात अडकून जीव गमावत असताना या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा संतापजनक सवाल नागरिकांनी केला आहे.

काय घडलं?

गुरुवारी रात्री ११ वाजता कामावरून परतणारा सूरज गवारी या तरुणाला दुचाकीवर खड्ड्याचा अंदाज आला नाही. पुढे जाणाऱ्या डम्परला ओव्हरटेक करणाऱ्या सूरजची दुचाकी खड्ड्यात अडकून पडल्याने तो थेट डंपरच्या मागच्या चाकाखाली फेकला गेल्याने त्याचा जागीच अंत झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील सर्व खड्डे खडीने बुजविले आहेत, मात्र खड्डे बुजविण्यासाठी हाताला मिळेल त्या खडीचा वापर करण्यात आल्याने ही मोठी खडी दुचाकीसाठी मदतीची होण्यापेक्षा त्रासदायकच होण्याची भीती आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात रस्त्यावरील खड्डे नागरिकांना त्रासदायक ठरू नयेत, यासाठी कोट्यवधी रुपयाच्या निधीची उधळपट्टी प्रशासनाकडून केली जाते, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना खड्ड्यांचा जाच दरवर्षीच सहन करावा लागतो. शहरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली असून हे खड्डे केव्हा बुजवले जाणार, असा नगरिकांचा प्रश्न आहे. अधिकारी ठेकेदाराला खड्डे बुजविण्याचे आदेश देत असले तरी ठेकेदाराकडून या खड्ड्यात केवळ चिखलमातीचा लेप दिला जातो. यामुळे पावसाळ्यात वाहनचालकांना केवळ खड्डेच नशिबी येतात. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते खड्ड्यांनी व्यापलेले असून हे खड्डे बुजविण्याचे आदेश देण्यात आल्याचे शहर अभियंत्यांकडून सांगण्यात आले असले तरी खड्ड्यांची संख्या कमी झालेली नाही.

दरम्यान, अपघातानंतर एका रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले असले तरी शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे असून हे खड्डे प्रशासनाने तत्परता दाखवत बुजवावेत अशी मागणी होती आहे.
पुणेकरांनो, रस्त्यावरील खड्ड्यांची आता थेट करा महापालिकेकडे तक्रार; या नंबरवर पाठवा फोटो
मागील चार वर्षांतील दुर्घटना

२०१९ सालात शिवाजी चौक दुचाकी स्वारांसाठी काळ ठरला होता. शिवाजी चौकातील उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमध्ये चौघांचा बळी गेला. यात दोन लहान मुलांचा समावेश
२०२१ मध्ये करोनाची लस घेण्यासाठी जात असलेल्या ३० वर्षीय दिव्या कटोरिया या तरुणीचा दुचाकीवरून पडून मृत्यू.
१६ जुलै २०२२ ला अंकित थैवा या तरुणाचा बदलापूर पाइप लाइन रोडवर खड्ड्यात गाडी अडकून बसखाली आल्याने मृत्यू.
३० एप्रिल २०२३ ला कल्याण-कचोरे रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी अडकल्याने हमिद नावाचा तरुण जखमी झाला होता.
२० जुलै २०२३ रोजी सुरज गवारी या तरुणाचा कल्याण पूर्वेतील मलंगरोड द्वारली रस्त्यावर दुचाकी घसरल्याने डम्परखाली आल्याने मृत्यू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed