• Sat. Sep 21st, 2024
कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे! पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच, चिंता वाढली

कोल्हापूर: दोन वेळा महापुराचा सामना करणाऱ्या कोल्हापूरला यंदाच्या वर्षी देखील महापुराचा सामना करावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यापासून जोर धरलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यावर चांगलीच धुवाधार बॅटिंग केली आहे. यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी पंचगंगेची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून पंचगंगा आपली इशारा पातळी गाठण्यासाठी केवळ तीन फूट कमी आहे. यामुळे प्रशासनदेखील सतर्क झाले आहे.
पावसाचा हाहाकार सुरूच! एकाच दिवशी तिघांचा बळी, सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे घरांचेही नुकसान
पुढील पाच दिवस हवामान खात्याने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुढील पाच दिवस कोल्हापुरात आणखी जोराने पाऊस होणार असून यामुळे पंचगंगा आपली इशारा पातळी लवकरच गाठेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रासह आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडी, गगनबावडा, शिरोळ या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने कोल्हापुरातील सर्व नद्या आपले पात्र सोडून वाहू लागल्या आहेत. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून पंचगंगेची पाणी पातळी ही ३६ फुटांच्या वर पोहोचली आहे. तर दोन दिवसांपूर्वीच पंचगंगेने आपलं पात्र सोडलं असून पाणी आता आजूबाजूच्या परिसरात शिरत आहे.

पंचगंगेची इशारा पातळी ही ३९ फूट असून धोका पातळी हे ४३ फूट आहे. यामुळे पंचगंगेची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू असून आपली इशारा पातळी गाठण्यासाठी पंचगंगा केवळ तीन फूट कमी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही गगनबावडा तालुक्यात करण्यात आली आहे. येथे जून महिन्यात १०७० मिलिमीटर तर जुलै महिन्यात आज अखेर पर्यंत १३६९ मिलीमीटर अशी सर्वाधिक पावसाची नोंद आहे. तर या पाठोपाठ राधानगरी तालुक्याची नोंद आहे. जिल्ह्यात खाजगी आणि सार्वजनिक अशी एकूण ५४ मालमत्तांची पडझड झालेली आहे. ज्यात एकुण १३ लाख ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात दिलासादायक म्हणजे एकही जीवितहानी झालेली नाही.

गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने गेले दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला होता. यामुळे शहरात पावसाने काही काळ उघडीप घेतली होती. मात्र भारतीय हवामान खात्याने आता पुढील पाच दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने पुढील पाच दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय घाट माथ्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंचगंगेची पाणी पातळी ही सध्या ३६ फूट ५ इंचावर पोहोचली असून जिल्ह्यातील तब्बल ७५ बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. तर जिल्ह्यातील सर्व धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून राधानगरी धरणात ७६.८६ टक्के पाणी साठा झाला आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या पावर हाऊसमधून १४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आला आहे. यामुळे पंचगंगा आपली इशारा पातळी लवकरच गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे यंत्रणा देखील सतर्क झाले असून पुराचा फटका बसणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय जिल्ह्यात एक NDRF ची तुकडी दाखल झाली आहे. तर त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि स्वयंसेवकांची टीम प्रत्येक गावात सज्ज ठेवण्यात आले आहे.
Weather Alert : राज्यात १४ जिल्ह्यांना पुढच्या ३-४ तासांचा अलर्ट जारी, मुंबई, पुण्यासह या भागांत तुफान पावसाचा इशारा
• जिल्हातील पाण्याखाली गेलेले बंधारे आणि मार्ग :
१.पंचगंगा नदी : – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
२.भोगावती नदी :- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे
३. कासारी नदी :- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण
४. हिरण्यकेशी नदी : साळगांव,सुळेरान,चांदेवाडी,दाभीळ, ऐनापूर, निलजी
५. घटप्रभा नदी :- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी
६.वेदगंगा नदी :-निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरूपली, चिखली, गारगोटी, म्हसवे, शेणग सुक्याचीवाडी, शेणगांव
७. कुंभी नदी :-कळे, शेनवडे, वेतवडे, मांडूकली, सांगशी, असळज
८. वारणा नदी :-चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, खोची
९. कडवी नदी :-भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे, सरूड पाटणे
१०.धामणी नदी :- सुळे, पनोरे, आंबर्डे, गवसे, म्हासुली
११. तुळशी नदी :-बीड, आरे, बाचणी
१२. ताम्रपर्णी नदी :-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकरे, कोवाड, न्हावेली
१३. दुधगांगा नदी :- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली

जिल्ह्यातील एकूण २४ पैकी ५ राज्यमार्गावर पाणी आल्याने वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. तर १२२ प्रमुख जिल्हा मार्गापैकी १० मार्ग ही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून एकंदरीत दोन्ही मिळून १५ मार्ग बंद करण्यात आले आहेत. सध्या या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed