जितेंद्र आव्हाड यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही. एखाद्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.
त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, ३०-४० वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला ५ मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.
मी १९९५ साली शरद पवार साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबा-याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले ‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या वैयक्तीक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणा-या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही.
