सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या टिफीन बैठकीत खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, सुरभी भोसले, सुनील काटकर, काका धुमाळ आदी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले की, ‘आगामी निवडणुका एकसंधपणे लढवून लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपचे उमेदवार निवडून आणले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या विकास योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचायला हव्यात. राज्यातील ७० टक्के लोक भाजपच्या बाजूने आहेत. त्यामुळे आपण महाविजय मिळवणारच आहे. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आदींना मी तलवार आणि वाघनखं भेट दिले आहेत. कारण शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानेच स्वराज्य उभे केले आहे. या पद्धतीने आपले सरकार उभे राहिले पाहिजे. यासाठीच मी त्यांना भेटलो आहे.’
काँग्रेसवर टीका करताना उदयनराजे म्हणाले, ‘गेली ७० वर्षे काँग्रेसने देशाला प्रगतीपासून वंचित ठेवले. महात्मा गांधींनी सत्तेचे विकेंद्रीकरण करा, असा संदेश दिला होता; परंतु तो संदेश फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित ठेवण्याचे काम काँग्रेसने केले आहे.’
भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे म्हणाले, ‘खासदार उदयनराजे भोसले हे जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्यपातळीवर कार्यरत असल्याचे मला आज दिसत आहेत. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. या राज्यात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश चालतो. त्याच छत्रपतींच्या वारसदारांनी आजच्या टिफीन बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस महत्त्व आले आहे. ही देशातील ऐतिहासिक टिफीन बैठक झाल्याची नोंद होईल. उदयनराजे भोसले यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला पाहायचे आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागून विविध राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या सर्वांना करावयाचे आहे. जिल्हा भाजपमय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथनिहाय कामाला लागावे.’
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातारा लोकसभा मतदारसंघात टिफीन बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी कांदा ठेचा भाजी-भाकरी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.