पन्हाळगड-पावनखिंड वारीत भर पावसात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांची ठिकठिकाणी राहण्याच्या सुसज्ज व्यवस्थेसह पूर्णपणे आराखडा तातडीने मार्गी लावला जाईल, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. पन्हाळगड-पावनखिंड विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्राच्या वतीने आयोजित पन्हाळगड पावनखिंड मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे होते. दरम्यान, मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली. यावेळी नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे व वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे पूजन झाले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, पावनखिंड मार्गावर दरवर्षी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी पन्हाळगड, खोतवाडी , करपेवाडी, आंबेवाडी, पांढरेपाणी आणि भातळी येथे सुसज्ज दोन मजली सभागृह बांधले जाईल. या पन्हाळगड पावनखिंड विकासाला आराखड्यास नुकत्याच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना कार्यवाही करण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. पुढील वर्षी ही व्यवस्था सर्व शिवभक्तांना उपलब्ध असेल. पन्हाळगडावर बांदल सेनेचे शिल्प उभा करण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी इतिहासासह पावनखिंड मोहिमे मागचा उद्देश विशद केला. या मोहिमेत वीर रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सेनापती कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत जेधे, बाळासाहेब सनस, करण झावणे-पाटील, मोहीम प्रमुख गणेश कदम, विनायक जरांडे, मोहन खोत, राजेंद्र पवार, विराज साळुंखे यांच्यासह देशभरातून 700 हून अधिक मोहिमेवर सहभागी झाले आहेत.