• Sat. Sep 21st, 2024

सह्याद्रीची पोरं हिमालयाच्या मदतीला; दरड हटवण्यासाठी नगरच्या तरुणांनी लावली जीवाची बाजी

सह्याद्रीची पोरं हिमालयाच्या मदतीला; दरड हटवण्यासाठी नगरच्या तरुणांनी लावली जीवाची बाजी

देहरादून: उत्तर भारतामध्ये पावसाचा हाहा:कार सुरू आहे. सतत कोसळणार्‍या पावसामुळे आता केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सोनप्रयाग (Sonprayag)आणि गौरीकुंडमध्ये (Gaurikund) ही यात्रा स्थगित केली आहे. मंदाकिनी आणि अलकनंदा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र पूर स्थिती निर्माण झाली. देशातील कानाकोपऱ्यातून अनेक भाविक हे केदारनाथ यात्रेला जात असतात. (Heavy Rainfall In North India)

यातच नगर तालुक्यातील वाळकी येथील मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी उत्तराखंड मधील केदारनाथ यात्रेला ९ तारखेला निघाले होते. मात्र, वाटेत त्यांना खराब हवामानाचा सामना करावा लागला. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या म्हणून दरड कोसळणे आणि पूर या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत होता. वाटेत पावसामुळे रुद्रप्रयाग ते सोनप्रयाग मार्गामध्ये दरड कोसळली व यामध्ये अनेक भाविक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले व रस्ता पूर्णपणे बंद पडला व रात्री उशिरा शासकीय मदत भेटत नसल्याने मनोज भालसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील लोकांना मदतीला घेऊन मध्यरात्री स्वतःच्या जीवाची परवा न करता कोसळलेली दरड आणि मोठे दगड बाजूला सरकून नऊ तासानंतर रस्ता मोकळा केला. त्यानंतर रस्ता मोकळा करून तेथील वाहतूक सुरळीत करून दिली. त्यानंतर शासकीय मदत उपलब्ध होऊन स्थानिक पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांनी मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी दीपक बोठे, गणेश बोठे, राजेंद्र आव्हाड यांचे आभार मानले.

दिल्लीवर महापुराचं संकट, यमुनेची पाणी पातळी वाढली, नागरिकांनी घेतला पुलाचा आसरा, हजारोंचं स्थलांतर

पंजाब, हरयाणातील पूरस्थिती कायम

पंजाब आणि हरयाणामधील पूरस्थिती बुधवारीही कायम होती. हरयाणातील अंबाला जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर, पंजाबमधील पटियाला, रूपानगर, मोगा, लुधियाना, मोहाली, शहीद भगतसिंग नगर आणि फतेहगड साहिब या जिल्ह्यांतील सुमारे दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दोन्ही राज्यांत पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या पर्यटकांपैकी ५० टक्के पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे.

दिल्लीत वाहतूक कोंडी

दोन-तीन दिवसांपूर्वीच मुसळधार पावसामुळे धोका उद्भवलेल्या राजधानी दिल्लीवर आता महापुराचे संकट घोंघावत आहे. यमुना नदीच्या पाणीपातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला असून, पुराचे पाणी नदीकाठच्या सखल भागांत घुसल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यमुनेची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

यमुनेची पाणीपातळी वाढल्याने दिल्लीत बुधवारी दिवसभर ठिकठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नदीकाठावरील स्थलांतरित कुटुंबांनी महामार्गांलगत रस्त्यांवरच निवारे उभारल्याने नोएडा, रिंग रोड, गाझियाबाद व गुरुग्रामकडून दिल्लीत येणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. नोएडा-दिल्ली, मेरठ-दिल्ली महामार्गांवरही दिवसभर भीषण वाहतूक कोंडी झाली. दिल्ली-गुरुग्राम महामार्गावर किमान दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed