राज्यातील सत्तासंघर्षाबाबत पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘विधानसभा अध्यक्षांना शिवसेना निलंबनाबाबत १० ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे. आधी खोक्याची भाषा वापरली. आता मंत्रिपदाची भाषा आहे. राज्याच्या प्रश्नाकडे कोणाचंच लक्ष नाही, या सगळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. सत्तेत राहण्यासाठी भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता साथ देत आहेत. ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असेल, तर मग कारवाई का केली नाही? ती त्यांची जबाबदारी होती. पक्षाचं नावं घेऊन आरोप करत असाल तर सखोल चौकशी झाली पाहिजे,’ असा हल्लाबोल चव्हाण यांनी भाजपविरोधात केला आहे. तसंच कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी तुटल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला सामोरे जाता येणार नाही, हे भाजपला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान, ‘मुख्यमंत्रिपदावर अजित पवार विराजमान होतील, याबाबत मला दिल्लीतील राजकीय वर्तुळातून ही माहिती मिळाली. दोन तृतीयांश आमदार आणि विलिनीकरण या मधला निकाल तर द्यावाच लागेल. त्यावेळी रिक्त पद, मग मुख्यमंत्री कोण होणार हे राजकीय विश्लेषण आहे. त्यांना मराठा चेहरा हवा आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील का, हा बऱ्याच दिवसांपासून प्रश्न त्यांच्यामध्ये होता. मोदी हट्टाला पेटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना लोकसभा निवडणूक जिंकायची आहे. दक्षिणेकडील राज्यातील दरवाजे भाजपला बंद झाली आहेत आणि सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला निवडणूक जिंकता येणार नाही, म्हणून हा काढलेला पर्याय आहे. पण भाजप तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
