• Sat. Sep 21st, 2024
अजितदादांच्या युतीनंतर भाजप-राष्ट्रवादीत पहिली ठिणगी कोल्हापुरात; घाटगेंचे मुश्रीफांना आव्हान

कोल्हापूर : राजकारणात ज्यांना अनेक वर्ष विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्याने भाजपच्या नेत्यांवर आली. पण, राज्यातील या नव्या समीकरणात आठ दिवसांच्या आत पहिली ठिणगी कोल्हापुरात पडली. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी नूतन मंत्री हसन मुश्रीफ यांना कागलच्या मैदानात हरविण्याचे आव्हान देताना आपण सोबती नव्हे तर विरोधकच आहोत याची घोषणाच केली. ही ठिणगी राज्यात अनेक ठिकाणी पडण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेला सोबत घेऊन गेले २५ ते ३० वर्ष भाजपने दोन्ही काँग्रेसविरोधात राजकारण केले. दोन्ही काँग्रेसला विरोध हाच कमळाच्या राजकारणाचा पाया. पण नव्या समीकरणात थेट राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेत लोकसभेचे गणित सोपे करण्याचा प्रयत्न सुरू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या बरोबर घेताना विचारापेक्षा सत्ताकारण महत्त्वाचे आहे, हे दाखवून दिले. पण यामुळे राज्यात अनेक नेत्यांची मोठी अडचण झाली आहे.

भाजपला विरोध करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचे राजकारण सुरू होते. पण राष्ट्रवादी पक्ष सोबत असल्याने ज्याच्या विरोधात लढायचे, त्याच्याच मांडीला मांडी लावून प्रचार करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. नव्या घरोब्यामुळे अनेकांना विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार नाही. यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. यातून आठ दिवसाच्या आताच आरोप प्रत्यारोपाने वादाची ठिणगी पडत आहे. त्याची सुरूवात कोल्हापुरात झाली आहे.

Sharad Pawar : मोदींचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप, आता पवारांनी टाकला बिनतोड डाव; चौकशीची मागणी करत म्हणाले…

गेले आठ वर्षे समरजित घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफांच्या विरोधात दंड थोपाटून तयारी करत आहेत. भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्ह्णून सामना केला. आता त्यांची उमेदवारी निश्चित असतानाच मुश्रीफ कमळासोबत आले. यामुळे घाटगेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यातून नाराज झालेले घाटगे चार दिवस नॉट रिचेबल होते. नंतर त्यांनी शक्तीप्रदर्शन करत थेट मुश्रीफांना आव्हान दिले आहे. काहीही होवो, तुमच्या विरोधात मैदानात उतरणार आणि निवडूनही येणार असे सांगत घाटगेंनी बाण सोडला आहे. मुश्रीफांनीही आपण लढणार आणि जिंकणार या शब्दात उत्तर देत प्रतिआव्हान दिले.

या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीवर अनेक नेते मात्र एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्याची सुरुवात कोल्हापुरात झाली आहे. त्याचे लोण राज्यात पसरण्याची चिन्हे आहेत. कारण शिंदे गट आणि पवार गट सोबतीला आल्याने भाजपच्या अनेकांची तिकिटे कापली जाणार आहेत. यामुळे अनेकांच्या तयारीवर पाणी फिरणार असल्याने वाद वाढण्याची शक्यता अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed