अजित पवारांच्या या बंडामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. यात सर्वात मोठी अडचण होणार आहेती सुप्रिया सुळे यांची होय. सुप्रिया सुळे या बारामती लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघात ६ विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी फक्त २ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. या दोन पैकी १ जागा अजित पवार (बारामती) तर दुसरी इंदापूरची असून तेथे दत्ता भरणे हे आमदार आहेत. भरणे हे अजित पवारांच्या गटात आहेत. तर अन्य ४ विभानसभेपैकी २ भाजपचे आणि २ काँग्रेसचे आमदार आहेत.
भाजपचे दोन आमदार म्हणजे भीमराव तापकीर हे खडकवासला तर राहुल कुल यांचा दौंड मतदारसंघ आहे. पुरंदरचे आमदार काँग्रेसचे संजय जगताप तर भोरचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे संग्राम थोपटे याच्याकडे आहे.
भाजपची नजर बारामतीवर…
भाजपने २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी पक्षाने काही हाय प्रोफाइल मतदारसंघावर फोकस केला आहे. गेल्या निवडणुकीपर्यंत जे मतदारसंघ भाजपच्या आवाक्यात नव्हते अशा पैकी एक मतदारसंघ आहे बारामती. भाजपने गेल्या काही काळापासून या मतदारसंघावर फोकस केला आहे. यासाठीच केंद्री अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अन्य केंद्री मंत्र्यांनी बारामतीचा दौरा केला होता. त्यांनी भाजपचे धोरण महिला, शेतकरी आणि युवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. इतक नाही तर बारामतीमधील डॉक्टर, शिक्षक आणि इंजिनिअर यांच्यासोबत बैठक केली होती. १९६७ पासून बारामती विधानसभेची जागा पवार कुटुंबाकडे आहे. तर १९९१ पासून लोकसभेची जागा पवार कुटुंबाकडे आहे.
१९९१ साली अजित पवार यांनी बारामती लोकसभेची जागा जिंकली होती. अर्थात त्यानंतर काही महिन्यात त्यांनी राजीनामा दिला होता. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता. २००४ पर्यंत तेच याच मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. २००९ पासून सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना १ लाखाहून अधिक मतांची आघाडी दिली होती. सुप्रिया सुळे यांचा विजय १ लाख ५० हजार मतांनी झाला होता. यात अजित पवारांच्या मतदार संघाचा मोठा वाटा होता.
आता अजित पवारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम सुप्रिया सुळेंच्या मतांवर होऊ शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत दौंड विधानसभेचे आमदार राहुल कुल यांची पत्नी कंचन कुल यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभे केले होते. तेव्हा त्यांना ५ लाख ३० हजार ९४० मते मिळाली होती. त्यांनी सुळेंना कडवी टक्कर दिली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात शहरी मतदार अधिक आहेत. पुणे शहरातील अनेक भाग या मतदारसंघात येतो. यात खडकवासला, कोथरूड आणि कात्रजचा समावेश आहे. त्यामुळे ही जागा गेमचेंजर ठरू शकते.