• Sat. Sep 21st, 2024

येरवड्यातील चौदा कर्मचाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनाच्या या निर्णयामागे आहे खास कारण

येरवड्यातील चौदा कर्मचाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनाच्या या निर्णयामागे आहे खास कारण

म. टा.प्रतिनिधी, येरवडा : येरवडा कारागृहात सातत्याने मोबाइल सापडून येण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चौदा संशयित कर्मचाऱ्यांची अमरावती, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग कारागृहांत बदली केली आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून येरवडा कारागृहाच्या आवारात आणि कैद्यांच्या बराकीत सातत्याने मोबाइल सापडून येण्याच्या घटना वाढल्या आहेत. येरवडा पोलिसांकडून मोबाइल वापरणाऱ्या कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे. प्रशासनाकडून अशा कैद्यांना मिळणाऱ्या सुविधांवर बंधने घातली जात आहेत; पण तरीही मोबाइल सापडून येण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत.

कारागृहातील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय आतमध्ये मोबाइल जाऊ शकत नाही, अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे कारागृहाच्या बाहेर कर्तव्य बजावणाऱ्या संशयित चौदा कर्मचाऱ्यांची इतर कारागृहांत बदली करण्यात आली आहे.

तसेच, मोबाइल बाळगणारे, भांडणे, मारामारी करणारे आणि टोळी चालविणाऱ्या एकूण २५ कैद्यांची येरवडा कारागृहातून इतर कारागृहांत रवानगी करण्यात आली आहे. याशिवाय आणखीन २५ कैद्यांना इतरत्र हलविण्यासाठी न्यायालयाला प्रस्ताव पाठविला आहे.
पिंक व्हॉट्सॲप इन्स्टॉल केलंय…? सावधान! नव्या व्हायरसद्वारे होईल मोबाईल हॅक, अशी घ्या काळजी
काही उपद्रवी कर्मचाऱ्यांना कारागृहाच्या आत प्रवेश नव्हता. अशा कर्मचाऱ्यांना कारागृहाच्या बाहेर वेगवेगळी कामे देण्यात आली होती. कारागृहात मोबाइल सापडल्यानंतर संशयित चौदा कर्मचाऱ्यांची इतर कारागृहांत बदली केली आहे. याशिवाय कारागृहातील पंचवीस कैद्यांचीही इतर कारागृहांत रवानगी केली आहे.- सुनील ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed