यावेळी जयंत पाटील यांना, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रसचे किती आमदार आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, मी असं समजतो की, ज्या ९ सदस्यांनी शपथ घेतली आहे, पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन त्यांनी पलीकडे पाऊल टाकले आहे. उरलेल्या सर्व आमदारांना मी दोष देणार नाही. त्यांनी कशावर सह्या केल्या असतील तर त्यामधील बरेसचे आमदार आज आमच्याशीही बोलत आहेत. अनेकजण शरद पवार यांना जाऊन भेटत आहेत. मलाही दिवसभरात बऱ्याच आमदारांचे फोन आले. गेल्या दोन तासांमध्ये बरेच आमदार आमच्याशी बोलले. त्यामुळे मला पत्रकार परिषद घ्यायला वेळ लागला, असे जयंत पाटील यांनी सांगितले. त्या सर्वांची नक्की भूमिका काय आहे, हे समोर आल्यावर आम्हाला विचार करावा लागेल. काही आमदारांनी असं सांगितलं की, आम्ही तिथे (राजभवनात) गेलो, आम्हाला सह्या करायला सांगितल्या, कशावर सह्या करतोय, हेदेखील दाखवण्यात आले नाही. आम्हाला सह्या कराव्या लागल्या. कशावर सह्या केल्या हे माहिती नाही, सांगणारे दोन-तीन आमदार मला भेटले, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
५ जुलैला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक
जयंत पाटील यांनी आपल्या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांच्याच पाठिशी असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेच्या आमदारांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली आणि विधानभवनात जाऊन शपथ घेतली. तुम्ही जे पाहिलं तेच आम्ही पाहिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यात शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे, असं मी स्पष्ट करतो, असं जयंत पाटील म्हणाले.