राज्यामध्ये आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काही दिवसांपूर्वी पहाटे झालेल्या शपथविधी अपयशी ठरल्यानंतर राज्याच्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. हे सगळं घडत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आले होते, यावेळी त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारमध्ये शपथ घेतली आहे. त्यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे त्यांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम बघून त्यांनी सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना माहित आहे, भविष्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भारताचे भविष्य उज्वल कोणी करू शकत नाही. यामुळे अजित पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे.
आता पुढे बघा काय काय होतं कोण-कोण एकटं पडतं ते बघा. उद्धव ठाकरे यांच्यासोबत किती लोक राहतील हा मोठा प्रश्न आहे. राज्यामध्ये असे छोटे मोठे भूकंप होत राहणार आहेत. यामुळे बघावं लागेल कोण कोणासोबत राहत राष्ट्रवादीमध्ये कोण राहील आणि शिवसेनेत कोण राहील, हा देखील संशोधनाचा विषय राहिल, असं देखील मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तसेच रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार देखील लवकरच होणार आहे.