यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दाखवण्यापुरता ओबीसी नेते लागतात. कारण, प्रमुख संवैधानिक पद द्यायची वेळ येते तेव्हा राष्ट्रवादीला ओबीसींचा विसर पडतो, ही गोष्ट आतापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आली आहे. ही गोष्ट मीच म्हणतोय असं नाही, आता त्यांच्याच पक्षातून मागणी आलेय की, ओबीसी प्रदेशाध्यक्ष करा. त्यांच्या पक्षातील नेते दबक्या आवाजात जे बोलतात, तेच मी अभिव्यक्त केलंय. अख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाच्या दबावात चालतो, पक्षात कोणाचा बोलबाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासगीत याबाबत बोलतात. मी ते जाहीरपणे व्यक्त केलं, ही गोष्ट शरद पवार यांना आवडली नसावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आता यावर राष्ट्रवादीच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शरद पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं, हा इतिहास बदलणार नाही: देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन केल्याची आठवण सांगितली होती. ती शरद पवार यांची मुत्सद्देगिरी असेल तर एकनाथ शिंदे यांच्या बंडाला गद्दारी कसे काय म्हणता येईल, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता. त्यावर शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस हे प्राथमिक शाळेत असतील. त्यांना तो सगळा इतिहास माहिती नसेल, अशी खोचक टिप्पणी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले. शरद पवार बरोबर बोलले, पुलोद सरकार स्थापन झाले तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो. पण मी तेव्हा जन्माला आलो होतो की नाही किंवा प्राथमिक शाळेत होतो, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मी हे बोललो होतो की, शरद पवार यांनी काँग्रेसमधील ४० लोकांना फोडून वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं होतं आणि नवं सरकार स्थापन केले. मी शरद पवार यांनी कुठेही बेईमानी केली, असे बोललो नाही. पण त्यामुळे शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले, हा इतिहास बदलणार नाही, अशी पुस्ती देवेंद्र फडणवीस यांनी जोडली.
नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणं अयोग्य: देवेंद्र फडणवीस
एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकल्या. यानंतर विजयी मिरवणुकीत नथुराम गोडसेची छायाचित्र असलेले बॅनर्स झळकावण्यात आले होते. याविषयी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ती एसटी कर्मचाऱ्यांची बँक आहे. त्याची निवडणूक झाली आहे. तिथे हा निवडून येतो किंवा तो निवडून येतो, याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की, या देशात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणं योग्य नाही. या देशात महात्मा गांधींचाच विचार चालेल. गोडसेचा विचार चालू शकत नाही”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.