• Sat. Sep 21st, 2024
महामार्गांवर मृत्यूची धाव; साडेचार वर्षांत तब्बल सव्वा लाख अपघात, धक्कादायक आकडा समोर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यात वाहतूक सुरळीत करून ‘समृद्ध’ होणाऱ्या महामार्गांवर सन २०१९ ते मे २०२३ पर्यंत १ लाख ३५ हजार १०३ अपघातांमध्ये ५९ हजार ५४६ प्रवाशी जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक माहिती आहे. तर, जानेवारी ते मे २०२३ या पाच महिन्यांत राज्यात साडेसहा हजार प्रवाशी ठार झाल्याने महामार्ग पोलिसांनी कारवाईसह प्रबोधनात्मक कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या गुलनेत सात टक्क्यांनी अपघाती मृत्यूंमध्ये घट झाली आहे.देशात सर्वाधिक अपघात होणाऱ्या महाराष्ट्रात सन २०२२ मध्ये १५ हजार २४४ प्रवाशांचा महामार्गावर मृत्यू झाला आहे. तर, २०२३ मध्ये आतापर्यंत झालेल्या १४ हजार ३४७ अपघातांमध्ये ६ हजार ४३७ मृत्यू, ८ हजार ६५७ गंभीर जखमी आणि ३ हजार ४१५ किरकोळ जखमी झाले आहेत. राज्य महामार्ग पोलिस दलाचे प्रमुख डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी घेतलेल्या आढाव्याअंती ही बाब समोर आली आहे. त्यानुसार जागीच मृत्यू होणाऱ्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सात टक्के घट झाली आहे. मात्र, किरकोळ अपघातात दोन टक्के, गंभीर अपघातांत एक टक्क्याने वाढ झाल्याचीही नोंद आहे.

यासह वयाच्या वर्गवारीनुसार अपघातांत २५ ते ३५ वयोगटातील पुरुष व महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याखालोखाल ३५-४५ या वयोगटातले प्रवाशी मृत होत असल्याचे नोंदीवरून स्पष्ट होते. त्यामुळे राज्य महामार्ग पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्यतेने पाहत संबंधित सर्व यंत्रणांशी चर्चा करून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, प्रवाशांनी नियमांचे तंतोतंत पालन करुन जीव वाचवण्यासह रस्ता सुरक्षेत हातभार लावण्याची यंत्रणेची अपेक्षा आहे.

येतो थोड्या वेळात! बाबा बाईकवरुन निघाले, मुलं वाट पाहत राहिली, पण परतलं पित्याचं पार्थिव
दुर्दैवं… हेल्मेट नव्हतं…

राज्यातील महामार्गांवर विनाहेल्मेट प्रवास करणे अत्यंत धोकादायक आणि जीवघेणे असल्याचे वारंवार सांगूनही चालक आणि प्रवाशी ऐकत नसल्याचे जाणवते. कारण, १० ते १६ जून या आठ दिवसांत महाराष्ट्रातील महामार्गांवर दुचाकींचे तेरा गंभीर अपघात झाले. त्यात १६ प्रवाशी मृत्यूमुखी पडले. ३ गंभीर जखमी झाले असून, पाचजण किरकोळ जखमी आहेत. यापैकी एकाही प्रवाशाने दुर्दैवाने हेल्मेट परिधान केलेले नव्हते. त्यामुळे कारचालकांसहित दुचाकीस्वारांचेही प्रबोधन केले जात आहे.

सर्व महामार्गांवर गस्त वाढवून वाहतूक सुरक्षेसंदर्भात प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्याचे नियमित ‘अपडेट’ घेत आहोत. यासह नागरिकांना वाहतूक सुरक्षेच्या मोहिमेत जोडून अपघात रोखण्यासाठी पथके प्रयत्नशील आहेत.

– डॉ. रवींद्र सिंगल, अपर पोलिस महासंचालक, महामार्ग पोलिस

कार्यवाही कोणती?

– ‘न्हाई’सोबत चर्चा करून ‘ब्लॅकस्पॉट’चा आढावा

– समृद्धी महामार्गावर विशेष लक्ष केंद्रीत

– नियमित दंडात्मक कारवाईवर भर

– कारवाई, समुपदेशन, प्रबोधनाचे नियमित राज्य मुख्यालयात ‘अपडेट’

– ‘एक्सप्रेस-वे’वरील कोंडी फोडण्यासाठी ‘मिसिंग लिंक’

– संबंधित यंत्रणांच्या समन्वयनातून रस्ते अपघात रोखणार

अपघातांचा लेखाजोखा

कालावधी————मृत—-गंभीर जखमी—-किरकोळ जखमी

जानेवारी ते मे २०२२——-६,९१५——८,६१०——–३,३६४

जानेवारी ते मे २०२३——-६,४३७——८,६५७——–३,४१५

वर्ष————मृत—-गंभीर जखमी—-किरकोळ जखमी

२०२२———-१५,२२४——-१९,५४०——-७,६९९

२०२१———-१३,५२८——-१६,०७३——-६,९९८

२०२०———-११,५६९——-१३,९७१——-५,९४३

२०१९———-१२,७८८——-१९,१५२——-९,४७६

एकूण——–५३,१०९—–६८,७३६—-३०,११६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed