…असा झाला गैरसमज
गोडसे यांनी सांगितले, की नाशिकरोड, देवास, म्हैसूरच्या प्रेसमधून पाचशे रुपयांच्या हजारो नोटा ज्यांचे मूल्य ८८ हजार ३२ कोटी रुपये आहे, या २०१५-१६ या आर्थिक वर्षात गहाळ झाल्याचे वृत्त खात्री न करताच प्रसारित झाले. अब्जावधी नोटा छापताना प्रेसमधून एक जरी नोट गहाळ झाली, तरी सखोल चौकशी होते. सर्व प्रेसने छापलेल्या नोटा आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बॅँकेच्या ‘चेस्ट’कडे जमा करायच्या असतात. नाशिकरोड प्रेसला रेल्वेनेच नोटा पाठविण्याची परवानगी आहे. काही वेळा तांत्रिक कारणामुळे रेल्वेला विलंब होतो. त्यामुळे नाशिकरोडला छापलेल्या नोटा रेल्वेने ३१ मार्च संपल्यानंतर १ किंवा २ एप्रिलला पोहोचल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे या नोटा त्या वर्षाच्या अकाऊंटमध्ये दाखविण्याएवजी पुढील आर्थिक वर्षाच्या हिशेबात दाखविल्या आहेत. आता असा विलंबच होऊ नये म्हणून रिझर्व्ह बॅँकेने १५ मार्च ही नोटा पोहोच करण्याची अंतिम मुदत केली आहे. या तीनही प्रेसकडून ३१ मार्चनंतर पोहोचलेल्या नोटांचा विचार न करता केवळ रिझर्व्ह बॅँकेकडे ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बॅँकेत जमा झालेल्या नोटांचाच विचार करून बॅँकेच्या वेबसाइटच्या हवाल्याने चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले. नाशिकरोड प्रेसमधून नोटा बाहेर पडल्याचे, रिझर्व्ह बॅँकेच्या ताब्यात दिल्याचे ‘अप टू डेट रेकॉर्ड’ आहे. या वृत्तानंतर रिझर्व्ह बॅँकेने सर्व प्रेसकडून नोटांचा अहवाल मागविला आहे. त्यानंतर बॅँक या प्रकरणावर अधिक प्रकाश टाकेल, असेही गोडसे म्हणाले.
नोटा रिझर्व्ह बॅँकेच्या ताब्यात दिल्याच्या काटेकोर नोंदी प्रेसकडे आहेत. करोना काळात शंभरावर प्रेस कामगारांचे प्राण गेले. पण, छपाई थांबली नाही. त्यामुळे प्रेसच्या प्रामाणिकतेवर कोणीही शंका घेऊ नये.-जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ