• Sat. Sep 21st, 2024

चक्रीवादळ गुजरातला धडकलं, वाऱ्यांचा वेग ताशी १२५ किमी, सौराष्ट्र आणि कच्छला तडाखा

चक्रीवादळ गुजरातला धडकलं, वाऱ्यांचा वेग ताशी १२५ किमी, सौराष्ट्र आणि कच्छला तडाखा

म. टा. प्रतिनिधी, पुणे/ वृत्तसंस्था, गांधीनगर : अतितीव्र ‘बिपर्जय’ चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानातील कराचीच्या दरम्यान जखाऊ बंदराजवळ किनारपट्टीला धडकले. चक्रीवादळाच्या लँडफॉलची (जमिनीवरील प्रवेश) संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान सुरू झालेली प्रक्रिया रात्री साडेअकरापर्यंत सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार वादळाच्या तडाख्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांब पडण्याच्या घटना घडल्या असून, वादळाचा जोर ओसरताच मदतकार्याला सुरुवात होणार आहे. रात्री उशिरापर्यंत जीवितहानीची नोंद झाली नाही.

मध्यम ते जोरदार पाऊस

गेले नऊ दिवस अरबी समुद्रावर घोंघावणारे ‘बिपर्जय’ चक्रीवादळ ताशी १२ किमी वेगाने गुरुवारी संध्याकाळी भारत-पाक सीमेजवळ गुजरात किनारपट्टीला धडकले. या वेळी वादळाच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटर इतका नोंदला गेल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली. गुरुवारी सकाळपासूनच सौराष्ट्र आणि कच्छ क्षेत्रामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

येथे बसला तडाखा

जखाऊ बंदरासह नारायण सरोवर, नलिया, मांडवी, द्वारका, पोरबंदर, जामनगर, मोरबी आदी ठिकाणांना वादळाचा थेट तडाखा बसला. किनारपट्टीवरील सखल भागांमध्ये वादळाशी संलग्न दोन ते तीन मीटर उंचीच्या समुद्राच्या लाटांचे पाणी शिरले असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली.

Monsoon : बिपर्जय चक्रीवादळाने चिंता वाढवली, मान्सून कधी बरसणार? हवामान विभागाने दिली नवी अपडेट
मदतकार्य सुरू

चक्रीवादळाची आपत्ती लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या एकूण ४० तुकड्या, तसेच नौदलाच्या २५ तुकड्या बचाव कार्य आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी संध्याकाळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी प्रशासनाला मदतकर्यासंबंधी सूचना दिल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे परिस्थितीचा आढावा घेतला.

Mumbai Weather Alert : मोठी बातमी: मुंबईत समुद्र खवळला; चौपाट्यांवर जाण्यास मनाई, किती तारखेपर्यंत असणार बंदी?
आज, जोर ओसरणार

‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार, ‘जमिनीवरून प्रवास करताना शुक्रवारी (१६ जून) सकाळी बिपर्जयची तीव्रता अतितीव्र श्रेणीपासून कमी होऊन चक्रीवादळाच्या श्रेणीपर्यंत येईल. ईशान्येकडे सरकताना वादळाची तीव्रता कमी होणार असली तरी, सौराष्ट्र, कच्छसह दक्षिण राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी जास्त ते अतिजास्त पावसाची शक्यता आहे.’

गुरुवारी काय घडले?

– गुजरातच्या किनारी भागातील आठ जिल्ह्यांतील एकूण एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

– कच्छमधील ४६,८०० जण सुरक्षितस्थळी

– राजकोट, जुनागड, पोरबंदर, गीर येथील नागरिकही मदत छावण्यांमध्ये

– स्थलांतर केलेल्या नागरिकांमध्ये ८९०० लहान मुले, ११३१ गर्भवती महिला, ४,६९७ ज्येष्ठ नागरिक

– गांधीनगर येथे राज्य आपत्ती दलाचा विशेष कक्ष स्थापन

पाकिस्तानातही खबरदारी

इस्लामाबाद : ‘बिपर्जय’ चक्रीवादळ गुरुवारी पाकिस्तानला धडकण्यापूर्वी दक्षिण सिंध प्रांतातील ६७ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, अनेक शहरांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

आकडे काय सांगतात?

१ लाख – नागरिकांचे स्थलांतर

५ हजार- धोकादायक होर्डिंग उतरवले

‘एनडीआरएफ’ची किनारी भागातील पथके- ३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed