• Tue. Mar 10th, 2026

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही पाण्याच्या थेंबभर अमृतासाठी जीवघेणा संघर्ष; नाशिक जिल्ह्यातलं भीषण वास्तव

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही पाण्याच्या थेंबभर अमृतासाठी जीवघेणा संघर्ष; नाशिक जिल्ह्यातलं भीषण वास्तव

    नाशिक:इगतपुरी तालुक्यात अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवण्याची क्षमता असूनही हा तालुका आज तहानलेला आहे. सध्या या भागातील अनेक गावांत पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. अनेक योजना कुचकामी ठरल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य वाढले आहे. पावसाचे माहेरघर अन् पावसाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्याला पाणीटंचाईचे ग्रहण सुरू झाले आहे.

    हा तालुका डोंगराळ व खडकाळ भागाचा असल्याने पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. बहुतांश पाण्याचे स्त्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. इगतपुरी तालुक्यात जीवन प्राधिकरण, राष्ट्रीय पेयजल, भारत निर्माण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, आदिवासी उपाययोजनेच्या माध्यमातून अनेक योजना खेडोपाडी राबविल्या जात आहेत. त्यातील अनेक योजना आज पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत.पण, योजनाच कुचकामी असल्याने बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे.

    धरणासाठी जमिनी घेतल्या पण पाण्याची सोय नाही. घोटभर पाण्यासाठी वर्षोनुवर्षे संघर्ष करावा लागत आहे. इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर गावाला जोडलेल्या बकुळेची वाडी आणि भैरोबावाडीची पाणीटंचाईमुळे भीषण अवस्था आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली नुकताच याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या अमृत महोत्सव काळातही येथील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबली नाही. त्यांच्या डोक्यावरील हंड्याचं ओझं अजूनही हलकं होऊ शकलं नाही.

    इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर परिसरात वाकी-खापरी धरण बांधण्यात आले, त्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमीनीही संपादीत केल्या गेल्या परंतू आजही धरणाचे पाणी औरंगाबाद आणि नगरला जाते. त्यामुळे धरणासाठी जमिनी देणाऱ्यांचे घसे आजही कोरडेच आहेत. येथे सध्या दोन बोर (हापसे) आहेत परंतू त्यावर एक हंडा भरण्यासाठी एक तास लागतो. त्यासाठी रात्री नंबरनुसार रांगा लावून पाणी भरावे लागते.

    येथील नागरिक चार महिने शेती काम करतात त्यानंतर आठही महिने त्यांना रोजगाराचा दुसरा मार्ग नसतो. या परिसरातील खेडे भैरोबाची वाडी, बकुळेची वाडी , तळ्याची वाडी , पायारवाडी, खडकवाडी, डुब्याची वाडी, असे वाळविहीर या गावाला जोडले आहेत. जवळच असलेल्या खडकवाडी, पायरवाडी, डुब्याचीवाडी येथे डबक्यातील झऱ्यामधून दोन किलोमीटर पाणी वाहण्याची वेळ महिलांवर आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed